फोंडय़ातील मुक्तीदिन सोहळय़ात मंत्री गोविंद गावडे यांचे उद्गार
प्रतिनिधी /फोंडा
गेल्या साठ वर्षांमध्ये मुक्त गोव्याने विकासाच्या आघाडीवर खूप मोठी झेप घेतली आहे. शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत आज सर्वच क्षेत्रात गोवा राज्य प्रगतीपथावर आहे. असंख्य ज्ञात व अज्ञात स्वातंत्र सैनिकांचा त्याग व बलिदानामुळे आज हे शक्य झाले आहे. ही प्रेरणा घेऊन व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेऊन गोमंतकीय नागरिकांना पुढे जायचे आहे, असे आवाहन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.
फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित केलेल्या हिरकमहोत्सवी मुक्तीदिन सोहळय़ात ते बोलत होते. मंत्री गोविंद गावडे यांनी येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. तिरंगा ध्वज फडकावल्यानंतर फोंडा पोलीस पथकातर्फे मानवंदना स्वीकारली. यावेळी फोंडय़ाचे माजी आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, विविध खात्यांचे सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
लोकशाही बळकट होईल, तेव्हाच राज्य व देश खऱया अर्थाने सक्षम होईल. विकासाची प्रत्येक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रशासन सज्ज असून लोकांचा सहभाग व सहकार्यामुळेच आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे विकास साधता येईल, असेही त्यांनी नमूद केले. सरकार हे लोकांचे व लोकांसाठी आहे, ही भावना प्रत्येक नागरिकांच्या मनात रुजली पाहिजे. स्वातंत्र्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करताना आपण माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे. हे सर्व करताना स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग व सिमेवर देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असेही ते पुढे म्हणाले.
शिरोडा येथील स्कूल ऑफ सिमबायोसिस या शाळेच्या शिक्षकांनी देशभक्तीपर समूहगीत तर सदर सरकारी हायस्कूलच्या शिक्षिकांनी लोकनृत्य सादर केले. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले.