प्रतिनिधी/ पणजी
राज्यात चोरी प्रकरणे मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याने पोलीस खात्याच्या कामगीरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या साडेचार महिन्यांत राज्यभरात 222 चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात 37 घरफोडय़ा तर 175 इतर प्रकारच्या चोऱया झाल्या आहेत. सातत्याने चोरीचे प्रकार घडत असताना पोलीस खाते काय करीत आहे? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन महिन्यांत दक्षिण गोव्यात मोठय़ा प्रमाणात चोरीची प्रकरणे घडली असून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले आहेत. लग्न समारंभ तसेच अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त रक्ताचे पाणी करून मिळविलेल्या पैशातून सर्वसामान्य लोक सोन्याचे दागिने खरेदी करतात आणि नंतर चोरटे ते दागिने चोरून पोबारा करतात. या साऱया प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारची सुरक्षा यंत्रणा सुस्तावली की काय असाही? प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोव्यात हॉटेल तसेच इतर ठिकाणी काम करण्यासाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय गोव्यात येत असतात. पर्यन हंगाम संपला की किंवा पावसाळा सुरु होण्याच्या तोंडावर ते कामगार आपापल्या गावात जात असतात. गावात जाण्याच्या वेळी एखाद दुसऱया ठिकाणी मोठी चोरी करून ते परत गावात जात असतात. त्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात चोरीची प्रकरणे वाढत असल्याचे एका पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
गोव्यात गेल्या साडेचार महिन्यांत 222 ज्या चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यापैकी 135 चोऱयांचा तपास लावण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. चोरीला गेलेले सोन्याचे दागिनेही काही प्रमाणात पोलिसांनी जप्त केले आहेत. चोरी प्रकरणात अधिकाधिक परप्रांतीयांचा हात असल्याचे उघड झाले आहे. आपल्या घरात किंवा अन्य ठिकाणी भाडेकरू ठेवत असताना त्याची सविस्तर माहिती संबंधित पोलीस स्थानकात द्यावी, असे पोलीस नेहमी सांगत असतात. मात्र लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असतात, त्यामुळे अनेकवेळा कोणत्याही घटना घडल्या की संशयितांचा शोध घेणे कठीण होत असते, असेही पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
एप्रिल-मे महिन्यांत चोऱयांचे प्रमाण अधिक
एप्रिल- मे महिन्यात अधिक प्रमाणात चोऱया होण्याचे दुसरे कारण म्हणजे याच महिन्यात लग्नांचा हंगाम सुरू होत असतो. बँक किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवलेले सोन्याचे दागिने लोक लग्न समारंभासाठी घरी आणतात. अट्टल चोरटय़ांना याची पूर्णपणे जाणीव असते. त्यामुळे ते पाळत ठेवून असतात आणि संधी मिळाली की हात साफ करीत असतात. साडेचार महिन्यांत 37 घरफोडी प्रकरणे झाली असून त्यातील 20 प्रकरणांचा शोध लावण्यास पोलीस यशस्वी झाले आहेत. पोलीस नियमितपणे आपले काम करीत असतात, मात्र लोकांनीही वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असेही पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
दुचाकी चोरीचे प्रकार वाढले
दुचाकी चोरी प्रकरणांची नोंदही राज्यातील विविध पोलीस स्थानकात होत असते. गोव्यात येणारे अधिकाधिक पर्यटक दुचाकी भाडय़ाने घेऊन फिरत असतात. काहीवेळा त्यांच्याकडील पैसे संपतात किंवा दुचाकी मालकाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे पर्यटक भाडय़ाने घेतलेली दुचाकी मिळेल त्याठिकाणी टाकून पोबारा करीत असतात. नंतर दुचाकी चोरीला नेली म्हणून दुचाकी मालक तक्रार दाखल करीत असतात. शेजारी राज्यातील भुरटे चोर गोव्यात येऊन दुचाकींची चोरी करतात, हेही प्रकार गोव्यात घडत असतात. अशा अनेक चोरटय़ांना गोवा पोलिसांनी अटक केली असून मोठय़ा प्रमाणात दुचाकी जप्त केल्या आहेत. अशीही माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.