‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत 25 ऑक्टोबरपर्यंत चालणार मोहीम : एकूण 7.19 लाख नागरिक
- आरोग्य यंत्रणेला सहकार्याचे जि. प. अध्यक्षांचे आवाहन
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ाची एकूण लोकसंख्या 7 लाख 19 हजार 652 असून या सर्वांचा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आरोग्यविषयक सर्व्हे केला जाणार आहे. 15 सप्टेंबरपासून जिल्हय़ात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. 19 तारीखपर्यंत 14,570 नागरिकांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. कोविड-19 या विषाणूच्या नियंत्रणासाठी होत असलेल्या या मोहिमेला जिल्हावासीयांनी सहकार्य द्यावे, असे आवाहन जि. प. अध्यक्ष सौ. समिधा नाईक, पदाधिकारी व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोविड विषाणूला प्रतिबंध करता यावा, यासाठी शासनाने प्रत्येक नागरिकाचा घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हे करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. यासाठी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबतच्या जिल्हा नियोजनाची माहिती देण्यासाठी जि. प. अध्यक्ष समिधा नाईक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, आरोग्य सभापती सावी लोके,
महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत गृहभेटी देण्यासाठी 546 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. एक पथक दररोज 50 घरांना भेट देणार असून घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
ताप, खोकला, दम लागणे आदी कोविड सदृश लक्षणे आढळणाऱया व्यक्तींना जवळच्या ताप उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात येईल. त्या ठिकाणी कोविड-19 ची चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. प्रत्येक पाच ते दहा आरोग्य पथकामागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्हय़ात 1 लाख 96 हजार 120 कुटुंबे आहेत. त्यामुळे एवढय़ा गृहभेटी होणार आहेत. या सर्वेक्षणासाठी 1614 स्वयंसेवक आणि 807 आशांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 76 पर्यवेक्षक आणि 76 वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्हय़ात सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा उपलब्ध दिसून येत आहे. मात्र आवश्यक असणाऱया 807 ऑक्सिमीटरपैकी 220 उपलब्ध असून 587 ची कमतरता आहे. तर 807 थर्मल गनपैकी केवळ 86 थर्मल गन सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. कमी असणारे साहित्य आवश्यकतेनुसार स्थानिक स्तरावर उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच हजार रुपये देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विविध स्पर्धा व बक्षीस योजना
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेंतर्गत निबंध, पोस्टर, आरोग्य, शिक्षण मेसेज या वैयक्तिक स्वरुपातील स्पर्धा होतील. तर संस्थांसाठी संस्थांच्या कामकाजानुसार बक्षीस देण्यात येईल. जिल्हास्तरावर नागरी आणि ग्रामीण विभागांतर्गत संस्था निवडून त्यांना बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी दिली.
काम न करण्याचा अंगणवाडी कर्मचाऱयांचा इशारा
या अभियानासाठी अंगणवाडी कर्मचाऱयांनाही सामावून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र याला अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी आव्हान दिले असून या कर्मचाऱयांना या कामातून वगळण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शासनाने मागणीची दखल न घेतल्यास 21 सप्टेंबरपासून जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचारी या मोहिमेचे काम करणार नसल्याचा इशारा दिला आहे. या कर्मचाऱयांनी काम न केल्यास प्रशासनाची भूमिका काय राहणार आहे, या प्रश्नाला उत्तर देताना त्या काम करीत नसल्याबाबतचा अहवाल आपल्याकडे प्राप्त झाल्यावर काय तो निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. वसेकर यांनी स्पष्ट केले. मात्र शासनाने नेमून दिलेल्या कामासाठी प्रत्येक कर्मचारी बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.