सातत्याने बायो-बबलमध्ये राहून अविश्रांत खेळत राहणे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी त्रासदायक ठरत आले आहे, अशी जाहीर कबुली न्यूझीलंडचा हंगामी कर्णधार टीम साऊदीने दिली आणि खेळाडूंना भविष्यात प्रदीर्घ कालावधीकरिता अशा बबलमध्ये रहावे लागणार नाही, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुबईत टी-20 वर्ल्डकप फायनल खेळल्यानंतर अवघ्या 72 तासांच्या आतच न्यूझीलंडची भारताविरुद्ध पहिली टी-20 लढत होत आहे. अवघ्या 5 दिवसात उभय संघात 3 लढती आयोजित करणे भरगच्च क्रिकेटचे उत्तम उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर साऊदीने चिंता व्यक्त केली.
‘कोव्हिडच्या अस्मानी संकटात तावून सुलाखून निघाल्यानंतर बबल्स व क्वारन्टाईनला सातत्याने सामोरे जाणे निश्चितच कठीण स्वरुपाचे राहिले आहे. कोव्हिड कालावधीमुळे स्पर्धांची पुनर्रचना अवघड आहे. मात्र, याबाबत सारासार विचार होणे आवश्यक वाटते’, याचा साऊदी याने येथे उल्लेख केला.
भविष्यात काय चित्र असेल, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. मात्र, सातत्याने बबलमध्ये रहावे लागत असेल, क्वारन्टाईची सक्ती पाळावी लागत असेल तर ते निश्चितपणाने अधिक त्रासदायक ठरु शकते, असे तो शेवटी म्हणाला. केन विल्यम्सनच्या गैरहजेरीत टीम साऊदीकडे टी-20 मालिकेसाठी नेतृत्वाची धुरा सोपवली गेली असून कसोटी मालिकेत ट्रेंट बोल्ट ही जबाबदारी सांभाळेल.