मथळय़ातील ‘डोंगरीदेव’ हे नामाभिधान निसर्गालाच देव मानणाऱया एका लोकत्सवाचे आहे. महाराष्ट्रातील उत्तर भाग आणि गुजरातमधील दक्षिण भाग हा राज्य निर्मिती पूर्वीचा एकसंध असणारा आदिवासींचा पट्टा. या पट्टीत सहय़ाद्रीच्या पश्चिम घाटात स्थिरावलेल्या कोकणा (यांना ‘कोकणी’ वा ‘कुकणा’ असेही म्हटले जाते) आदिवासी समुदायाच्या जीवनप्रणालीचा हा एक जीवन महोत्सव. रुढी-परंपरेद्वारे काही जीवनमूल्ये मानवी समाजात रुजवण्याचा प्रयत्न उत्सवांतून केला जातो. मानववंशशास्त्रज्ञांचे, सामाजिक अभ्यासकांचे संशोधन या निष्कर्षांना दुजोरा देतात. डोंगरीदेव उत्सव काळात कोकणा जमातीतील माणसे एकमेकांशी कटाक्षाने, सहृदयतेने, सौहार्दाने, शिस्तीने, औदार्याने आणि प्रेमाने वागतात. याच जमातीची जैविक खूणगाठ अंगाखांद्यावर पांघरलेले आणि आयुष्यभर हीच जीवनमूल्ये जगलेले प्रो. भौमिक आनोजी देशमुख वयोमानाच्या निर्हतेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नुकतेच (31 मे) निवृत्त झाले आहेत.
विलक्षण ऋजु स्वभावाच्या सरांचे विद्यार्थी त्यांना प्रिय असलेल्या ‘आदिवासी’ समुदायासारखे देशभर आणि देशाबाहेरही विखुरलेले आहेत. सर, फक्त औदार्य आणि पाहुणाचारापुरती देशमुखी वा पाटीलकी दाखवतात. एरवी त्यांना ‘बुजरे’ म्हणता येईल एवढे संकोचलेपण वा अलिप्तता घेऊन ते व्यवहारात वावरतात. आदिवासी समाजासारखीच स्वनियंत्रित वृत्ती, प्रबळ महत्त्वाकांक्षेकडे न झुकणारी समाधानी प्रवृत्ती आणि स्पर्धात्मक झुंडीपासून निवृत्ती हे त्यांच्या निर्मोही स्वभावाचे सोपान दर्शन आहे. आयुष्यात अनेकदा कटु अनुभव घेऊनही माणसातील माणूसपण जपण्यावर आणि माणुसकीचा ‘आदीम’ धर्म जगण्यावर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे. वयाने दोन पिढी कमी अंतर असणाऱया विद्यार्थ्यांनादेखील ते आदरार्थाने संबोधतात. आप्त विद्यार्थ्यांना मारलेल्या एकेरी हाकेतही त्यांच्या मायेचा ओलावा खोलवर जाणवत असतो.
सरांचा जन्म साकोडे गावचा. आज साकोडे गाव सटाणा नगर परिषदेत असले तरी, हा पूर्वीचा बागलाण तालुका. सुगराणा संस्थान आणि बडोदा संस्थानाचे सख्य होते. या दोन्ही संस्थानांची गावेही एकमेकांना लागून असलेली. आता दस्तावेज उपलब्ध नसले तरी देशमुखांच्या पूर्वजांचा सुगराणा संस्थानाशी संबंध असल्याचा इतिहास मौखिक आहे. ऐतिहासिक उलथापालथीत माणसे परागंदा झाली. साकोडे गावाची 2011 मधील लोकसंख्या 1,476 होती. यावरून साठ वर्षांपूर्वीच्या गावाचा आणि गावातील संसाधनांचा अंदाज येईल. तांत्रिकदृष्टय़ा गावात शाळा 1955 मध्ये आली. स्थापनेपासून, तब्बल बारा वर्षांनी गावातील पहिली आठ मुले चौथी इयत्ता पास झाली. त्यात देशमुख सरही होते. तोवर गावातल्या शाळा न पाहिलेल्या अनेक पिढय़ा शेतीमध्ये स्थिरावल्या होत्या. काही स्थलांतरीत झाल्या होत्या. पाचवी ते दहावी इयत्तांसाठी त्यांनी पुन्हा चार शाळा आणि चार गावे अनुभवली. घरची थोडीबहुत शेती असली आणि कोकणा जमात ही इतर आदिवासी समुदायांच्या तुलनेत शेतीमध्ये स्थिरावलेली असली तरी हा काळ अभावांचा होता. दुष्काळांचा होता. पुढे औरंगाबादला आंबेडकर महाविद्यालयात अकरावी, बारावी आणि देवगिरी महाविद्यालयातून वाणिज्य विषयाची पदवी मिळवण्यात त्यांना सहृदय मित्रांचा हातभार लाभला. पदव्युत्तर समाजकार्य शिक्षणाची संधी, उशिरा पोचलेल्या पत्रामुळे जवळजवळ चुकलेली होती. चिकाटी आणि प्रसंगावधान, बाहेती सर आणि प्राचार्या हेमलता कुलकर्णी यांच्या सहकार्यामुळे त्यांचा समाजकार्यातील चुकलेला प्रवेश सुकर झाला. आपल्या मेहनतीने शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरल्यामुळे, त्यांना याच महाविद्यालयाने शिक्षक होण्यासाठीचा ‘आत्मप्रत्यय’ आणि ‘आत्मविश्वास’ दिला होता. सदर महाविद्यालयासाठी त्यांनी पहिल्यांदा शिक्षक पदासाठी मुलाखत दिली होती. मंगेश कुलकर्णी या मित्रामुळे त्यांच्या शिक्षकी पेशाच्या कारकिर्दीची सुरुवात लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयापासून झाली. कोकणा जमातीतील मोठय़ा हुद्यापर्यंत पोचलेले देशमुख सर हे त्यांच्या गाव शिवारातील पहिलेच उच्चशिक्षित होते. याचे सर्व श्रेय जीवनजाणिवांनी समृद्ध असलेल्या त्यांच्या निरक्षर वडिलांना जाते.
मराठवाडय़ातील तो काळ धामधुमीचा. नामांतर आंदोलन शिगेला पोहोचलेले. लातूरात, समाजवादी साथींची संगत आणि सोबत त्यांना अधिक लाभली. वाचनाच्या प्रारंभालाच त्यांनी विवेकानंदांचे दहा खंड वाचून काढले. आंबेडकरी मित्र सुधीर अनवळेमुळे त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर वाचले. लातूर सारख्या जिल्हावजा ‘निवांत’ गावांची वाचनासाठी अनुकूलता असते. समाज सुधारकांच्या डोळस इतिहास वाचनामुळे त्यांची प्रतिभा बहुश्रुत झाली. ‘ईझम’मुक्त होण्यास हे बहुधांगी वाचनच उपयोगी पडल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यांच्या, लातूरहून पुण्याला स्थलांतरीत होण्यामागची गोष्ट तरुणांनी आवर्जून समजून घेण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील चार समाजकार्य महाविद्यालयांना अंशतः अनुदेय प्रणालीतून पूर्ण अनुदान पात्रतेसाठी एका समितीला सामोरे जायचे होते. या समितीत प्रो. निरंजना गोकर्ण, प्रो. कालिंदी मुजूमदार, डॉ. सुनंदा कौशिक यासारखे ज्ये÷ प्राध्यापक आणि राम बेलवडी (भा. प्र. से.) होते. महाविद्यालयाच्या आग्रहानुसार समितीला देशमुख सर शिकवीत असलेल्या वर्गावर मुद्दामहून नेण्यात आले होते. सरांचे शिकवणे पाहून गोकर्णबाईंनी त्यांना टाटा समाज विज्ञान संस्थेच्या तुळजापूर केंद्राचा प्रस्ताव दिला होता. याच समितीतील डॉ. कौशिक, सरांना कर्वे समाज सेवा संस्थेत आणण्यात यशस्वी झाल्या. कर्वेतील दिवसांनी त्यांच्या अध्यापनाच्या दृष्टीचा आणि कौशल्याचा पाया अधिक विस्तृत केला. कर्वेच्या अंगीभूत मर्यादा ओळखून ते भारती विद्यापीठात आले.
या अभिमत विद्यापीठाचा अनुभव घेऊन ते पुणे विद्यापीठाच्या प्रौढ, निरंतर आणि विस्तार शिक्षण विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे प्राध्यापकही झाले. 2006 मध्ये सुगावा प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ‘कोकणा-कोकणी इतिहास आणि जीवन’ या ग्रंथामुळे त्यांचा लौकिक वाढला. त्यांना संशोधक, अभ्यासक म्हणून मान्यता मिळाली. कोकणा जमातीवरील संशोधनाबाबत हा ग्रंथ डॉ. नंदकुमार कामतांसारख्या अभ्यासकांनादेखील उद्धृत करावासा वाटतो. विकीपिडीया वा गुगुलवर शोध घेतल्यास आपल्याला या ग्रंथाच्या प्रामाण्याचे दाखले दिसतील. इंग्रजी, मराठी मिळून 10 पुस्तके, 24 शोधनिबंध, अनेक परिषदांमधील बीजभाषणे, मराठीमधील वैचारिक, पाक्षिक-मासिकांमधील समृद्ध लिखाणामुळे त्यांची शैक्षणिक कारकीर्द भरजरी राहिलेली आहे. मोठय़ा पदांनी हुलकावणी दिलेले देशमुख सर आजही अलिप्त डोंगरांसारखे उंच आणि अविचल आहेत. डोंगरी देवाच्या या पाईकाकडून अधिक सकस संशोधन आणि लिखाण व्हावे याच शिक्षणक्षेत्राकडून अपेक्षा आणि शुभेच्छा आहेत.
डॉ. जगदीश जाधव