नागरिकांना फटका, कामकाज सुरळीत करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जुन्या तहसीलदार कार्यालयात सातबारा उताऱयाची पूर्तता करणाऱया केंद्रात सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शिवाय उतारा केंद्राचे काम सुरळीत सुरू नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना वेळेत शासकीय कागदपत्रे मिळावीत, याकरिता जनस्नेही केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र या केंद्रांत वारंवार सर्व्हरडाऊन आणि तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने शासकीय कागदपत्रे वेळेत मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे संबंधितांना तहसीलदार कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. या केंद्रातून सातबारा उतारा दिला जातो. त्यामुळे केंद्रासमोर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र केंद्र वारंवार तांत्रिक अडचण पुढे करून बंद ठेवले जात आहे. काहीवेळेला सर्व्हरडाऊनच्या तक्रारी नागरिकांना सांगितल्या जात आहेत. त्यामुळे शासकीय कागदपत्रांविना नागरिकांना माघारी परतावे लागत आहे.
शासनाने शासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी जुन्या तहसीलदार कार्यालयासह उचगाव, सांबरा, काकती आदी ठिकाणी जनस्नेही केंदे सुरू केली आहेत. मात्र ग्रामीण भागात असलेल्या जनस्नेही केंद्रांकडे दुर्लक्ष करून नागरिक जुन्या तहसीलदार कार्यालयातच गर्दी करत आहेत. त्यामुळे केंद्रावर ताण वाढत आहे. याकरिता ग्रामीण भागात असलेल्या जनस्नेही केंद्रांचे काम सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे. सातबारा उतारा काढण्यासाठी आधीच गर्दी होत आहे. त्यातच मंगळवारी सर्व्हरडाऊनमुळे काम थांबल्याने नागरिकांना ताटकळत थांबावे लागले.