तलाठय़ाकडून कामास विलंब – चूक दुरुस्तीशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धार
सातारा
सातबारा उताऱयाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी देगाव, ता. सातारा येथील तुकाराम गणपत मांढरे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. त्यांनी हार्मोनियम आणलेली असून उपोषणस्थळी भजने गावून महसूल खात्याकडून न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत.
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातबारा उतायाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आम्ही यापूर्वीच अमरण उपोषण करणार होतो मात्र गाव कामगार तलाठी यांनी उपोषण न करण्याची विनंती करत सातबारा उतायाच्या दुरुस्तीसाठी मला काही वेळ द्या असे सांगितले होते. दोन महिन्यात सातबारा उतायाची दुरुस्ती न झाल्यास मी पुन्हा उपोषण करणार असा इशारा त्यांना दिला होता. मात्र गाव कामगार तलाठी यांनी आपला शब्द न पाळल्यामुळे आमच्या कुटुंबातील अकराजण सदस्य गुन्हेगार असल्यासारखे वावरत आहेत.
प्रशासनाकडे सातत्याने सातबारा उताऱयातील चूक दुरुस्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र प्रशासन आपली चूक न सुधारता कायद्याने दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळे जोपर्यंत सातबारा मधील उताऱयाची चूक दुरुस्त करून मिळत नाही, तोपर्यंत आपण आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.