प्रतिनिधी / कोल्हापूर
महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पण मात्र या संदर्भातील कार्यवाही करणे शासनाच्या अटी, शर्तीमुळे अशक्य असल्याचे महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग आरक्षणाची सोडत सोमवारी झाल्यानंतर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. महापालिका कर्मचाऱयांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या, शासनाच्या अटी आणि शर्तीची पूर्तता होत असेल तरच वेतन आयोग लागू करता येतो. आर्थिक वर्षात 90 टक्के घरफाळा वसुली, शंभर टक्के रिव्हीजन असेसमेंट, 35 टक्क्यांपेक्षा जास्त अस्थापनावरील खर्च असू नये, विकासाला निधी कमी पडता कामा नये, अशा काही महत्वाच्या अटी, शर्ती आहेत. सद्यःस्थितीत या अटींची कोल्हापूर महापालिका पूर्तता करू शकत नाही. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करणे सध्या तरी शक्य नाही. याबाबत महापालिका कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱयांबरोबर येत्या 29 डिसेंबरला बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये आयोग लागू करण्यासंदर्भात असलेल्या अडचणींवर चर्चा केली जाणार आहे, असे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
हरकती, सूचना आणि सुनावणी
प्रभाग आरक्षण सोडत झाल्यानंतर त्या संदर्भात सूचना, हरकती घेण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदत आहे. महापालिकेच्या ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात कार्यालयीन वेळेत हरकती सूचना स्वीकारल्या जातील. त्यानंतर त्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुनावणी होईल, असे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
नाले वळविण्याचे काम युद्धपातळीवर
पंचगंगा प्रदूषण रोखण्यासंदर्भात उपाय म्हणून शहरातील नाले एसटीपीकडे वळविण्यात येत आहेत. वीटभट्टी, ड्रिमवर्ल्ड वॉटरपरिसर, राजहंस, लक्षतीर्थ आणि रमणमळा हे नाले रोखणे आणि वळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
एसटीपीतील प्रक्रिया केलेले पाणी झाडांना
कसबा बावडा लाईन बाजार येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) प्रक्रिया केले जाणारे पाणी शहरातील आयआरबीच्या रोडवर मध्यभागी असणाऱया झाडांसाठी टँकरव्दारे वापरण्यात सुरूवात केल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
पाणीपट्टी थकविणाऱया गावांना इशारा
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरा लगतच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पण काही गावांनी पाणीपट्टी थकविली आहे. अशा गावांना थकीत पाणीपट्टी भरण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. पाणीपट्टी भरली नाही तर प्रसंगी त्या गावांचा पाणीपुरवठा रोखण्यात येईल, असा इशाराही डॉ. बलकवडे यांनी दिला.