खासदार उदयनराजे भोसले
प्रतिनिधी/ सातारा
आनेवाडी असो वा तासवडे टोलनाका असो, सातारकरांना गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा त्रास सुरु आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते वर टोलवसुली आणि त्यात फास्टॅगमुळे वैतागलेल्या सातारकरांना टोलमधून माफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पुणेकरांना मिळते तर सातारकरांना का नाही असा सवाल करत खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील मुदत संपलेले टोलनाके बंदच करा, अशी मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना टोलनाक्यांच्या प्रश्नांवर छेडले असता त्यांनी टोलनाक्यांच्या बेशिस्त कारभारावर संताप व्यक्त करतानाच ठेकेदाराला देखील सुनावले. जिल्हा प्रशासन काय झोपा काढतेय काय? असाही सवाल खासदार उदयनराजेंनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून फास्टॅगवरुन वाहनधारकांना टोलनाक्यांवर प्रचंड त्रास होत आहे. त्यातच पुणे ते सातारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ताही प्रचंड खराब आहे.
टोलनाक्यावरुन मला नेहमी टार्गेट केले जाते, मात्र टोल चालवणारा काही माझा मेव्हणा नाही. जनतेला चांगले रस्ते, चांगली व फास्ट सेवा मिळालीच पाहिजे ही माझी भूमिका आहे. पुणे जिल्हय़ातील टोलनाक्यावर पुणेकरांना टोलमधून माफी देता तर सातारा जिल्हय़ातील जनतेलाही सातारकरांनाही दिली गेली पाहिजे, यासाठी आपण केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे होवून कित्येक वर्षे उलटली आहेत. ज्या ठेकेदार कंपनीने हे काम केले असेल त्यांचे पैसे कधीच फिटले आहेत. मात्र एवढी वर्षे होवून देखील एक्सप्रेस वे वर टोल सुरुच आहे. एवढेच नाही तर राज्यातील अनेक टोलनाके गेली कित्येक वर्षे टोलवसुली करत आहेत. त्यांची मुदत संपलेली आहे. शासनाने हे टोलनाके बंद केले करुन राज्यातील जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशीही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
ठेकेदार कंपनीवर कारवाई करा
पुणे-सोलापूर हायवे किती सुंदर झालाय. पण सातारा ते पुणे हायवेची दुर्दशा झालीय. वरुन टोलवसुली सुरुच आहे. मग ठेकेदार कंपनीवर ऍक्शन घेतली पाहिजे ना. जुन्या टोलनाक्यांची वसुली थांबली पाहिजे. मुदत संपलेले टोलनाके बंद करा. याची जबाबदारी नॅशनल हायवे ऍथोरिटी व जिल्हा प्रशासनावर आहे. मग त्यांनी कारवाई करायला नको का. प्रत्येक वेळी माझ्यावर शेकवले जाते. माझा काय संबंध? टोलनाका चालवणारा काय माझा मेव्हणा आहे काय? चांगले रस्ते रस्ते हा जनतेचा हक्क आहे. तो मिळत नसेल ठेकेदारावर कारवाई करा.
खबरदार.. महाराजांच्या पुतळ्याला हात लावाल तर
वेळे (ता. वाई) येथे खंबाटकी घाटानजिक विराजमान असेलला छत्रपती शिवाजी महाराजांचा 50 फुटी पुतळा राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण पथकाने आज हटवण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न शिवभक्तांनी तीव्र विरोध करुन हाणून पाडला. दरम्यान, महामार्गावर उभा असलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि सातारा राजधानी सेल्फी पॉईंटला कोण हात लावेल त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला नुसता स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः मी अश्वारुढ पुतळ्याच्या तिथे उभा राहतो, बघूया त्या पुतळ्याच्या जवळ यायची कोणाची हिम्मत आहे.’ असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण विभागाला दिला.