प्रतिनिधी/ सातारा
कोरोना व्हायरसने जगभर घातलेला धुमाकूळ सर्वजण पाहत आहेत. त्या कोरोनाला हरवण्यासाठी शासन व प्रशासनाने लॉकडाऊन केला आहे. मात्र, नेमका तोच पाळला जात नसल्याने त्याचे गंभीर परिणाम आपल्यासह आपल्या उगवत्या पिढीला भोगावे लागतील. संपर्क टाळा म्हणजे संसर्ग टळेल एवढे सोपे सुत्र घेवून घरात न बसण्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. शहरी भागासह आता ग्रामीण भागालाही घरातच बसून हा लढा यशस्वी करावा लागणार असून तीच जिद्द बांधून सातारकरांनो, चटणी-भाकर खा पण घरात रहा हे कृतीत आणावे लागणार आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी उपाय योजना सुरु झाल्यापासून लॉकडाऊनचा पर्याय समोर आला. सातारा जिल्हय़ात हळूहळू लोक येत होते. काही परदेशातून जावून आले होते. लाखो माणसे मुंबई, पुण्यातून जिल्हय़ात येत होती. एकीकडे प्रशासन गर्दी टाळा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, रस्त्यावर फिरू नका म्हणून जीवाच्या आकांताने पायाला भिंगरी लावून फिरत होते. पोलीस दर 24 बाय 7 कामाला लागलेले आहे. त्यांचेही काही महाभाग ऐकत नसल्याने शेवटी दांडक्याची भाषा लोकांना सांगावी लागली.
वास्तविक सातारा जिल्हय़ातील माणसे ही समाज सुधारणा घडवणारी, क्रांतीचा वसा सांगणारी, थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा अभिमान मिरवणारी आणि आमचा सातारी बाणा कसा श्रेष्ठ असतो हे सांगणारी. पण लॉकडाऊन नंतरही त्यांना पोलिसांनी घरात बसा म्हणून सांगण्याची पाळी येतेय हे खूप दुर्दैवी आहे. पुणे, मुंबईहून आलेल्या नागरिकांमधून आता कोरोनाबाधित पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईकरांनी स्वतःहून तपासणी करुन घेणे व स्वतःला क्वारंटाईन करुन घेवून जिल्हय़ाला वाचवले पाहिजे. मात्र तसेच होताना दिसत नाही. आता सावध रहा कारण जिल्हय़ात पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून त्यातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हय़ातील नागरिकांच्या जीवाची काळजी प्रशासन करत आहे. काही माणसे हे युध्द लढत असलेल्या आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाला रस्त्यावर जावून मदत करत आहे. उन्हातान्हात, रात्रंदिवस जिल्हय़ातील जनतेच्या सुरक्षेसाठी झटणाऱया या यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठीच सर्व सातारकरांनी सभ्य नागरिक असल्याचे दाखवण्याची वेळ आलीय. तरुण असो वा वृध्द असो संपर्क आला की कोरोनाची बाधा होवू शकते. त्यापेक्षा घरातच राहिला आणि सुरक्षित राहून प्रशासनाच्या लढाईला बळ दिले तर कोरोना हद्दपार होईल.
पण हे सगळे केव्हा तर लॉकडाऊन यशस्वी करण्याची मानसिक, शारीरिक तयारी सर्वांनी करुन ठेवली तरच जगभरातील मृत्यूचे तांडव हजारो किलोमीटर अंतरावर दूर चालले आहे म्हणून जो बेफिकीरपणा आलाय तो सोडावाच लागेल. संयम राखून आपल्या कुटुंबासह, मुलांबाळांसह सर्वांचे रक्षण व्हावे असे वाटत नसेल तर मग सातारकरांसारखे मूर्ख जगात कोणी नाहीत हेच आपण सिध्द करण्यास निघालोय असे वागू नका. घरीच थांबा, काळजी घ्या आणि सर्वांचे रक्षण करण्यास कटिबध्द व्हा. हेही दिवस जातील आणि मग कोरोनाला हरवण्यासाठी तुम्ही केलेल्या त्यागाची दखल जग घेईल. तुम्ही सुरक्षित असणे तुमच्या कुटुंबासाठी, देशासाठी खूप आवश्यक आहे.