सातारा / प्रतिनिधी :
पालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी तपासणीत सातारकरांना दिलासा देणारी बातमी आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेचे पाणी शुद्ध व पिण्यायोग्य असून, त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी आहे. ही बाब पाणी तपासणी अहवालात स्पष्ट झाली आहे.
कास ही शहराची सर्वात जुनी पाणी योजना आहे. पूर्वी खापर नळातून पाणी सातारा शहरात येत होते. या नळांच्या जागी बंदिस्त पाईपलाईनने घेतली. शहराची लोकसंख्या ही वाढु लागल्याने सातारा नगर पालिकेकडून 2004 साली शहापूर योजना साकारण्यात आली. उरमोडी नदीचे पाणी पंपिंग करून ते जकातवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. शहापूर योजनेचे पाणी जकातवाडी तर कासचे पाणी पॉवर हाऊस येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. यानंतर पाणी साठवण टाक्यांतून नागरिकांना वितरीत केले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर व तुरटीचा उपयोग केला जातो. शिवाय या पाण्याची प्रयोग शाळेत दैनंदिन तपासणीही केली जाते. या तपासणीत दोन्ही योजनांचे पाणी क्षारमुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा पालिकेकडून शहरातील वीस प्रभागांमधून पाण्याचे संकलन केले जाते. या संकलनासाठी पाणी पुरवठा विभागाने एक पथक नेमले आहे. जलशुद्धीकरण केंदातून पाणी साठवण टाक्यांमध्ये भरले जाते. यानंतर त्या नागरिकांना पुरवठा केला जातो. प्रत्येक पेठेतील पाणी आठवड्यातून एकदा घरातून संकलित केले जाते. हे पाणी एका काचेच्या बाटलीत भरून पुढे त्याची शुद्धता व इतर चाचणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठवले जाते. या अहवालाची नोंदही पाणीपुरवठा विभागात नियमित केली जाते.