प्रतिनिधी/ सातारा
दिवसा पडणारे कडक ऊन व अधूनमधून निर्माण होणारे ढगाळ वातावरणामुळे रविवारी उकाडा वाढला होता. या वाढत्या उकाडय़ामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून कडक ऊनही जाणवत आहे. यामुळे पारा 40 अंशांवर पोहचला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. यामुळे खरेदीसाठी सातारकर दररोज मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत आहेत. मे महिना सुरू असून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सातारकर मात्र उकाडय़ाने हैराण झाले आहेत. रविवारी कडक ऊन व अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा मोठय़ा प्रमाणात वाढला होता. सर्वत्र सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळपर्यंत उन्हाचा चांगलाच चटका बसत होता. कधी ढगाळ वातावरण तर कधी अंगाची लाहीलाही करणारा कडक उन्हाचा तडाखा अशा संमिश्र तापमानामुळे सातारकर नागरिक रविवारी चांगलेच घमाघुम झाले.
तापमानाची दाहकता एवढी होती की, पंखा लावला की त्यामधून गरम वाफा येत होत्या. दुपारच्या सुमारास शहर व परिसरातील रस्ते कडक उन्हामुळे निर्मनुष्य झाले होते. वाढत्या उष्म्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहानमुले व इतर रूग्णांना दिवसभर अस्वस्थता जाणवत होती. दिवसेंदिवस नदी, ओढे, व विहीरीमधील पाणी पातळी खालवत चालली आहे. त्यामुळे जिह्याच्या काही भागात पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागला आहे.