सातारची माती ही कसदार आहे. इथले पाणीही चांगले आहे. व्यायामासाठी अजिंक्यतारासारखा मोठा डोंगर आहे. पण मल्लांना घडवण्यासाठी चांगले प्रशिक्षक नसल्यामुळे सातारच्या मल्लांवर कुस्तीत यश मिळवताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे सातारच्या मल्लांनी कोल्हापूर, पुण्याचा रस्ता धरला आहे. उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम सातारच्या कुस्तीबद्दल अतिशय पोटतिडकीने ‘तरूण भारत’शी बोलत होते.
परांडा (जि. उस्मानाबाद) येथील ऊसतोड मजूर असलेल्या पै. बाळासाहेब पडघम परांडा व्हाया कोल्हापूर मार्गे सातारला आल्यानंतर कुस्तीत स्वतःचे नाव कमावले. लहानपणी मला कुस्तीची आवड होती. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आई वडिलांच्या बरोबरीने फडात ऊसतोड करण्याशिवाय पर्याय नव्हता. थेऊर साखर कारखान्यावर ऊसतोड करीत असताना माझ्या डोळय़ासमोर मोठा अंधार दिसत होता. कष्ट करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. माझे मन उसाच्या फडापेक्षा कुस्तीच्या फडातच जास्त रमत होते. आमच्याच गावातील जाधव नावाचा मुलगा कोल्हापूरला तालमीत होता. त्यामुळे मलाही कोल्हापूरला जाण्याची ओढ लागली होती. घरातून परवानगी मिळत नव्हती. तरी देखील एक दिवस आईवडिलांना न सांगता खिशात केवळ 50 रूपये असताना कोल्हापूरचा रस्ता धरला आणि कोल्हापूरला शाहुपुरीत तालमीत दाखल झालो. माहुलीचे सर्जेराव जाधव यांचा चिरंजीव विजय जाधव यांचा मी स्वयंपाकी म्हणून राहिलो. दररोज तालमीत मेहनत करत असल्याने वजनही वाढत गेले. वर्षभरानंतर विजय जाधव यांनीच मला साताऱयात आणले.
सातारच्या तालमीत दररोज सराव आणि व्यायामातील सातत्यामुळे मी घडत गेलो. 1991 साली 74 किलो वजन गटात मी सातारचे प्रतिनिधीत्व केले. आणि 1992 साली 82 किलो वजनगटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत साताऱ्याला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर कधी मागे वळून बघितले नाही. 1995 साली राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटात खेळताना दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळाला. सातारा आणि सांगली जिल्हय़ातील लोकांनी माझ्यावर खूप पेम केले. सातारमध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होतेय ही आनंदाची बाब आहे. जिल्हय़ातील जुन्या जाणत्या मल्लांना यामुळे चांगल्या कुस्त्या पहायला मिळत आहेत.
दमवाला बाळू
दररोज तीन टन ऊस तोडण्यामुळे हातात प्रचंड ताकद आली होती. आणि सातारला सरावाला आल्यानंतर दररोज अजिंक्यताऱ्याचा डोंगर चढणे, पायऱया मारणे यामुळे पायातही ताकद होती. लढतीत अजिबात दम लागत नव्हता. उत्तर भारतात दिल्लीसारख्या ठिकाणी जेव्हा अनेक मल्लांशी सतत लढत देऊनही थकत नसल्यानेच उत्तर भारतीय मल्लांना माझ्याबद्दल आश्चर्य वाटायचे. ते मला ‘दमवाला बाळू’ असे म्हणायचे.