प्रतिनिधी/ सातारा
मूळचे कसबा पुणे येथील नकुलराव नितीनराव शितोळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुजा नकुलराव शितोळे या दाम्पत्याचा सिंगापूर येथे सुरू असलेला ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सिंगापूरवासियांना चांगलीच उर्जा देत आहे. अनुजा ही साताऱयातील अमर जाधव यांची कन्या असून सातारच्या लेक मोरयाचा जयजयकार सिंगापुरात घुमवत आहे. हे दांपत्य गेली सलग आठ वर्ष आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पासह गौरींची प्रतिष्ठापना आहे. परदेशात राहूनही या दाम्पत्याचे मराठी संस्कृतीप्रती असलेले प्रेम पाहून सिंगापूरवासीय भारावून जात आहेत.
सातारा येथील प्रगतशील शेतकरी अमर जाधव, अरुणा जाधव यांची कन्या अनुजा आणि कसबा पुणे येथील नितीनराव शितोळे, निलीमा शितोळे यांचे चिरंजीव नकुलराव यांचा विवाह झाल्यानंतर सुमारे आठ वर्षांपूर्वी हे दांपत्य व्यवसायानिमित्त सिंगापूरात वास्तव्य करीत आहे. मुळात जाधव आणि शितोळे या कुटुंबियांना महाराष्ट्रात फार इतिहास आहे. त्यामुळे या दोन्ही कुटुंबामध्ये मराठी सण, संस्कृती, वैचारिक देवाण-घेवाण याला अनन्य साधारण महत्व आहे.
संपूर्ण देशामध्ये गणपती उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वात मोठा उत्सव, मनाला भावणारा उत्सव म्हणून याची ओळख आहे. विघ्नहर्ता अशी ओळख असणारा गणपती बाप्पा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात वास्तव्य करतो. गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व विघ्ने दूर होतात अशी एक धारणा आहे. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे मराठी बाण्याला बळ देणे, मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे असे मानले जाते.
मराठी संस्कृतीचे संवर्धन करत कसबा पुणे येथील शितोळे दांपत्य गेल्या आठ वर्षापासून सिंगापूर येथील आपल्या निवासस्थानी बाप्पासह गौरींची प्रतिष्ठापना करत आहे. गणेशोत्सवापूर्वी कसबा पुण्याच्या शितोळे सरकारांकडून गणरायाच्या मूर्तीची मागणी करून प्रतिष्ठापना केली जाते. याच दरम्यान गौराई, त्यांचे दागिने, सजावटीचे साहित्य, फुलांचे हार हेसुद्धा पुणे येथून मागवले जाते. महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे गणराय आणि गौरीची प्रतिष्ठापना केली जाते.
गेल्या आठ वर्षापासून ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोष सिंगापुरात देखील घुमत आहे. गणपतीच्या आरतीमध्ये ते स्वतः सहभागी होतात. एवढेच नव्हे तर गणरायाच्या आरती साठी सिंगापूरमधील अत्यंत प्रसिद्ध व्यक्तींच्या रांगा लागलेल्या असतात. उद्योजक, डॉक्टर, वकील, कलाकार यांचा त्यामध्ये समावेश असतो. शितोळे दाम्पत्यांना राणा जयराज व तुळजा आणि जिवाजी अशी तीन मुले आहेत. सिंगापूर सारख्या प्रगत देशांमध्ये मराठी संस्कृतीचे जतन करत शितोळे दांपत्याने आपल्या तीन मुलांपुढे मराठी पाऊल पडते पुढे असा एक आदर्श घालून दिलाय.