प्रशासनाचे नियम धाब्यावर; पहाटेच उरकला बगाड कार्यक्रम
वाई / प्रतिनिधी :
काशिनाथाच्या नावाचं चांगभलं घालत बावधनकरांनी बगाड यात्रा आज पहाटेच उरकली. वाई तालुक्यातील मांढरदेवनंतर बावधनची यात्रा सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून भाविक येतात. परंतु या वर्षी कोरोनामुळे वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी कलम 144 लागू केले होते. बावधन गाव प्रतिबंधित म्हणून जाहीर केले होते. गावात स्ट्रायंकिंग फोर्स अन् मोठा पोलीस बंदोबस्त गेले पाच दिवस गावात होता. वारंवार वाईच्या डीवायएसपी डॉ.शीतल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे हे यात्रा कमिटी सोबत बैठका घेत होते. मात्र, कोरोनाचे नियम कितीही कडक लावले तरी ग्रामस्थांनी आपली बगाडाची तयारी सुरू ठेवली होती.
होळीच्या रात्री बगाड्या ठरला होता. बगाडाचा रथ ही तयार केला होता. खरी परीक्षा होती ती बगडाच्या दिवशी निघणाऱ्या बगाडाची. ग्रामस्थांनी पहाटेच बगाड काढण्याची जय्यत तयारी केली होती. त्यानुसार बगाडाचे बैल बगाडाची सुरुवात होते त्या ठिकाणी पहाटे पोहचले. गावात रात्री मिरवणूक निघाली होती. तिकडे पोलीस व्यस्त असताना इकडे बगाड काढण्यात आले. पहाटेच सूर्य उगवण्यापूर्वी गावात बगाड पोहचले. पोलिसांनी बगाडाच्या यात्रेचे चित्रीकरण केले असून, बगाड यात्रा काढून ग्रामस्थ जिंकले अन प्रशासन हरले अशीच चर्चा वाई तालुक्यात सुरू आहे.