●धर्मरक्षक राजधानी सातारच्या मावळ्यांनी दोन टप्यात राबवली मोहीम
●तेरा जणांनी केले श्रमदान
प्रतिनिधी/सातारा
सातारा शहर ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे तो अभेद, अजिंक्य असा अजिंक्यतारा, याच अजिंक्यताऱ्यावर काही दिवस मराठ्यांची राजधानी होती. अनेक रहस्य आज या किल्ल्यावर पहायला मिळतात. किल्ल्यावर दोन धान्याचे कोठार आहेत. या कोठारांची अवस्था खूप बिकट झाली होती.सातारच्या धर्मरक्षक राजधानीच्या मावळ्यांनी रविवारी मोहीम राबवून ते कोठार मोकळे केले. आणि अखेर या कोठाराने मोकळा श्वास घेतला.
किल्ले अजिंक्यतारा येथील राजसदरेवरून दिलेल्या आदेशावरून अटकेपार मराठ्यांनी झेंडे लावल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज याच किल्ल्यावर 56 दिवस मुक्कामी होते. छत्रपती शाहू महाराजांनी याच किल्ल्याच्या पायथ्याला सातारा शहर वसवले, असे अनेक दाखले इतिहासात आहेत, असे इतिहासिकतज्ञ सांगतात. याच किल्ल्यावर असलेल्या पुरातन वास्तू संवर्धनासाठी गटकोट प्रेमी सतत प्रयत्न करत असतात.
त्यापैकी एक संघटना म्हणजे धर्मरक्षक राजधानी सातारा ही. किल्ले अजिंक्यताऱ्यावर बहुतांश लोकांना अपरिचीत अशी दोन धान्य कोठारे आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात दगड माती गाळ साचला होता. सहा जून व आज अशा दोन टप्प्यांत धर्मरक्षक राजधानी सातारा च्या मावळ्यांनी श्रमदानातून बाहेर काढले. त्यामुळे दोनपैकी एका धान्य कोठाराने मोकळा श्वास घेतला व लवकरच आपण शेजारी असलेल्या दुसऱ्या धान्यकोठाराचं ही संवर्धन करू, असा निर्धार या मावळ्यांनी घेतला आहे. या दोन मोहीमेत विशाल शिंदे, हर्षवर्धन माळी, गणेश कदम, सागर माळी, ओंकार गाढवे, शुभम ठिगळे, सुहास माळी, संदिप कुंभार, सागर कर्णे, कुणाल शिंदे, अभिनंदन हुंबे, प्रियांका तोरसकर, विद्या जाधव व इतर रणरागिणी उपस्थित होते.