सातारा / प्रतिनिधी :
भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याने थकीत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावी, अन्यथा येत्या चार दिवसात रयत क्रांती संघटना कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे शंकरराव शिंदे मधुकर जाधव, प्रकाश साबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उसावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते, असे असताना सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्याकडून ते आश्वासन पूर्ण झाले नाही. एफआरपीची रक्कम अद्यापी दिलेली नाही. त्यामुळे येत्या चार दिवसात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतरही कारखान्यांनी एफआरपी दिली नाही तर त्या कारखान्यांसमोर रयत क्रांती संघटना आंदोलन करणार आहे.
एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांना करण्याच्या संकटात उसाची एफआरपी दिली जात नाही. शेतकरी अगोदरच संकटात सापडलेला आहे. त्यातच महावितरण शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे कनेक्शन तोडू लागलेला आहे. कारखानदारांनी जर एफआरपी दिली तर विज बिल भरता आले असते. आता मात्र, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने वीज बिल कसे भरणार हा प्रश्न पडला आहे. सक्तीने वीज कनेक्शन तोडले जात आहे, ते थांबवावे, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.