गोडोली / प्रतिनिधी :
नव्याने सातारा नगरपालिकेत समावेश झालेल्या विलासपूरमधील गणेश नगर, राधिका कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी परिसरातील गेली चार दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, याबाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. नागरिकांनी थेट नगराध्यक्षा आणि पाणी पुरवठा सभापतींकडे तक्रार करून आंदोलनचा इशारा दिला. याची दखल घेत नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुचना देताच प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
हद्दवाढ झाली असली तरी मुलभूत सुविधांपासून नव्याने समावेश झालेला भाग वंचित आहे. त्यात सतत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने नगरपालिका आणि शासकीय यंत्रणा दाद देत नाही. याचा अनुभव गेली चार दिवस झाले पाणी पुरवठा विस्कळीत झाली तरीही जीवन प्राधिकरण आणि नगरपालिकेकडून विलासपूर मधील राधिकानगर, फॉरेस्ट कॉलनी, गणेश नगरमधील नागरिकांना आला. पाणी पुरवठा होत नसल्याने जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर स्थानिकांनी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा आणि माजी नगरसेविका धनश्री महाडिक यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी थेट नगराध्यक्षा माधवी कदम आणि पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करून स्थानिक नागरिकांचा असंतोष सांगितला. तक्रारींची दखल घेत नसल्याने आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर तत्काळ दखल घेऊन जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सुचना देत पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यायला लावले.
यावेळी माजी सरपंच बाळासाहेब पिसाळ, मसूजी मॅडम अभय जगताप,जीवन प्राधिकरणाचे अभियंता स्वप्नील जाधव,नगरपालिकेचे संदीप सावंत, नंदकुमार कांबळे, सुदाम घाडगे,काही नागरिक यावेळी उपस्थित होते.