प्रतिनिधी / औंध
आखाडे बंद असल्याने पैलवान हवालदिल झाले आहेत. कुस्ती क्षेत्र मोडून पडते कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पैलवानांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तालीम, आखाडे पुन्हा सुरू कराव्यात यासाठी सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाने जिल्हाधिकारी यांचेकडे धाव घेतली आहे. कोरोनाच्या महामारीने सगळच उन्मळून पडले आहे. यातून कुस्ती क्षेत्र देखील सुटलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने आखाडे, व्यायामशाळा, तालीम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.तालीम बंद असल्याने पैलवानांना लढतीचा सराव करता येत नाही. त्यामुळे पैलवान सहा महिन्यांपासून कुस्ती पासून दूर आहेत.
उत्तर भारतात शासनाने तालीम आखाडे सुरू केले आहेत. मात्र राज्य सरकारने तालीमी सुरू करण्यासाठी अद्याप निर्णय घेतलेला नाही. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला आहे. नवा हंगाम सुरू होण्यासाठी पैलवानांना पुरेशा सरावाची गरज आहे. त्यासाठी शासनाने आखाडे सुरू करून कुस्ती क्षेत्रातील मल्लांना दिलासा द्यावा यासाठी मल्लविद्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली गोपीशेठ शहा संग्राम माने,सागर डांगे, रोहित शिंदे यांनी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे तहसीलदार आशा होळकर यांना निवेदन देऊन तालीमी पुन्हा पुर्ववत सुरू. कराव्यात अशी मागणी केली.
खाशाबांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा.
सातारा जिल्ह्यातील सुपूत्र आँलम्पिक पदक विजेते स्व खाशाबा जाधव यांना केंद्रशासनाने मरणोत्तर पझ्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी देखील निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.