कोरोनाच्या धास्तीने प्रवाशांची संख्या मंदावली
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊनमुळे सर्वसामन्यांची एसटीबस तब्बल दोन महिने बंद होती. चौथ्या टप्प्यात थोडी शिथीलता दिल्यानंतर गत आठवडय़ात जिह्यांतर्गत एसटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र एकाच आठवडय़ात प्रतिसादाअभावी 9 डेपोतील बसेस रद्द करण्यात आल्या आहे. अशी माहिती सातारा आगार प्रमुख कनिष्ठ रेश्मा गाडेकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यामुळे सर्वात जास्त फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसला होता. गेली अनेक वर्षापासून एसटी महामंडळ तोटयात आहे. यात लॉकडाऊनमुळे आणखी भर पडली आणि तब्बल 2 महिने एसटी बस बंद होत्या. चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनचे नियम शिथील करत जिह्यातर्गंत एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. 11 आगारातून सकाळी, सायंकाळी दोन-दोन फेऱया चालू झाल्या तरी कोरोनाची धास्ती अद्याप कायम आहे. यामुळे लोक प्रवास करणे टाळत आहेत. सुरूवातीचे दोन दिवस दोन-तीन प्रवासी घेऊन एसटी बस धावत होती. यामुळे तोटय़ात आणखी वाढ झाली होती. तो कमी करत ज्या मार्गावर जाणाऱया प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्याच मार्गावर एसटीबस सुरू आहे. सध्या जिह्यातर्गंत सातारा-कराड सकाळी 1 फेरी जात आहे. यात 20 प्रवासी असतात. तर सातारा-फलटण सकाळी 1 फेरी यामध्ये 10 ते 12 प्रवासी असतात. सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत एसटीबस बस सोडण्यात येते.