– काशीळच्या माने कुटुंबियांकडून जून्या पंरपरेला उजाळा
– काशीळहुन अतितला बैलगाडीतून मुलीची पाठवणी
प्रतिनिधी / नागठाणे :
सजवलेले बैल….. घूंगराची रंगीत गाडी…… आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वसा (वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या करंड्या) पोचवायला निघालेला पिता…….हे दृष्य एकविसाव्या शतकात दुर्मिळ होत चालले आहे. एकेकाळी ग्रामीण भागातील शेतकरी पिता आपल्या नवीन लग्न झालेल्या आणि पहिल्यांदा माहेरी मुलीला सासरी परत पाठवताना गोड-धोड पदार्थानी भरलेल्या करंड्या घेऊन बैलगाडीने सासरी पोहचवत असे. मात्र, आता वेगाच्या जमान्यात याची जागा मोटारगाड्यांनी घेतली आणि ही परंपरा हळू हळू काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. मात्र, काशीळ (ता. सातारा) येथील माने कुटुंबियांनी आपल्या मुलीला बैलगाडीतून सासरी पोचवत जुन्या आठवणीना उजाळा दिला.
हिंदू धर्मात लग्नानंतर पहिल्या संक्रातीस सासरहून माहेरला वसा नेला जातो. सक्रांत झाल्यानंतर मुलीच्या माहेरातून वसा (ववसा) घेऊन सासरी सोडण्याची पद्धत आहे. काळाबरोबर या पद्धतीत बदल होत गेला आहे. सध्या युगात चारचाकी गाड्यातून वसा आणला- नेला जातो. मात्र, या पद्धतीला माने कुटुंबियांनी फाटा दिला आहे.
येथील तुकाराम गोविंद माने यांचे पाच भावाचे शेतकरी कुटुंब आहे. बागायत भागात बैलाचे संगोपन हाताच्या बोटावर मोजण्या इतके शेतकरी करत असले तरी या कुटुंबाचा मुख्य आधार शेती असल्याने घरी बैलजोडी संगोपन केले जाते. या कुटुंबातील तुकाराम माने यांची पुतणी व सुनिल माने यांची मुलगी शिवानी हिला तिचे सासर अतित (ता.सातारा) संक्रातीसाठी आणले होते.
सक्रांत झाल्यावर तिला सासरी पाठवताना माने कुटुंबीयांनी नव्या पद्धतीत बदल करत पांरपारिक पद्धतीचा अंवलंब केला.यावेळी त्यांनी बैलांची जोडी बेंदूर सणाप्रमाणे घुंगरू, रंगरंगोटी व सजावट केली. तुकाराम माने यांनीही फेटा बांधून हा वसा (ववसा) व आपल्या मुलगी शिवानी हिला या सजवलेल्या बैलगाडीतून सासरी पोहचविले. काशीळ ते अतितचा पाच किलोमीटर प्रवास त्यांनी मुलीला घेऊन केला आहे. त्यांनी आधुनिक युगातही पांरपारिक पद्धतीने मुलीला सासरी पाठवत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.