●1.85 पॉझिटिव्हीटी रेटची वार्ता समाधानकारक
● गत 24 तासात 203 रूग्ण वाढले
● 10 हजार 951 संंशयितांच्या चाचण्या
● जिल्ह्यात लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न कौतूकास्पदच
● शासकीय कार्यालयांतच निर्बंधांची ऐशीतैशी
● सातारा जिल्ह्यातील स्थितीने रूग्णवाढीची भिती
● शासकीय कार्यालयात शिस्तीची गरज
सातारा, प्रतिनिधी
गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच शुक्रवारी जिल्हावासियांच्या कानावर सुखःवार्ता पडली. चा महिन्यातील सर्वात कमी 203 कोरोना रूग्णांंची वाढ गेल्या 24 तासात झाली असून या वाढीने निच्चांकी 1.85 पॉझिटिव्हीटी रेट गाठला आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरत असताना जिल्हापरिषदेमार्फत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ‘महा’लसीकरण अभियान राबवले जात आहे. या अभियानामुळे लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून ताटकळत बसावे लागणारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे जिल्ह्याच्या सार्वजनिक ठिकाणी नियमांची पायमल्ली होतच आहे. आता शासकीय कार्यालायांच्या आवारातच मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळण्याचा बेफिकिरपणा वाढल्याचे ‘तरूण भारत’च्या पाहणीत समोर आले. काही तहसील कार्यालये, पंचायत समित्या,नगरपरिषद कार्यालयांच्या आवारातच विनामास्क किंवा मास्क गळ्यात घेऊन वावरणारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिव्याखालीच अंधार अशी परिस्थिती आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी नियम मोडत असलेल्या सर्वसामान्यांवर कारवाईच्या सुचना द्याव्यातच पण शासकीय कार्यालयात अन् आवारात नियमांचे पालन व्हावे, यासाठी ‘स्मरणपत्र’ही काढावे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
पॉझिटिव्हीटी कमी होतेय…जिल्हा सावरतोय
जिल्ह्यात चार महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रूग्णवाढीचा पॉझिटिव्हीटी रेट अत्यंत खाली घसरला आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात 1.85 पॉझिटिव्हीटी रेट असून 10 हजार 951 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. लसीकरणही वाढत असून कोरोना रूग्णसंख्याही शासकीय आकडेवारीनुसार आटोक्यात येत आहे. सातारा जिल्ह्याने विशेषतः सातारा, फलटण, कराड, खटाव, कोरेगांव, माण तालुक्यांनी दुसरी लाट किती नुकसानकारक ठरली हे जास्त अनुभवले. आत्ता सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात या तालुक्यांसह जिल्हा सावरत आहे. यातच लसीकरणाचा वेग वाढल्याने संभाव्य लाटेचा धोकाही पुसट होत असताना निर्बंधांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
एकीकडे ‘महा’लसीकरण दुसरीकडे दिव्याखालीच अंधार
कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्याचे मोठे नुकसान करणारी ठरली. यातून शहाणपण घेऊन सार्वजनिक ठिकाणी वावरणे ही संभाव्य धोक्याच्या दृष्टीने गरज आहे. जिल्हाधिकारी वारंवार नियम पाळण्याचे आदेश काढत असले तरी आता शासकीय कार्यालयांनाच कोरोना नियमावलीचा विसर पडला आहे. गुरूवारी ‘तरूण भारत’ने सातारा, कराड, पाटण भागातील शासकीय कार्यालयात प्रातिनिधीक स्वरूपात पाहणी केली असता नियमावलीचा पुरता फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. जिल्हापरिषद, तहसील कार्यालये, नगरपरिषदांच्या कार्यालयांसह आवारातच विनामास्क फिरणारांची संख्या वाढली आहे. आवारातच काय? कार्यालयांमधे सुद्धा मास्क गळ्यात अडकवलेले कितीतरी जण कोरोना गेल्या आर्विभावात दिसत होते. शासकीय कार्यालयांच्या सावलीतच नियमांचे पालन होत नसेल तर मग सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठांमधे नियम न पाळणारांवर नियंत्रण ठेवायचे कोणी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 203
एकूण मुक्त 630
एकूण बळी 00
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने – 1956783
एकूण बाधित -245685
घरी सोडलेले -234809
मृत्यू -6022
उपचारार्थ – 7804