सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील आसले येथील युवकाचे अपहरण करुन खून केेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सहा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. तर फरार दोघांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
रोहन राजेंद्र यादव, रोहित संजय घाडगे, समाधान उर्फ चंप्या राजेंद्र शिंदे, सलीम ख्वाज्यासाहेब शेख (सर्व रा. भुईंज, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आसले येथील ओमकार कैलास चव्हाण (वय 30) हा दि.4 रोजी घरात पाचवड येथील नेट कॅफेत जावून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आला नसल्याने त्याचे वडिल कैलास लक्ष्मण चव्हाण यांनी तो बेपत्ता झाल्याची खबर भुईंज पोलीस ठाण्यात त्यांनी दिली. दरम्यान पोलीस तपासात ओमकारचा 6 जणांनी लाकडी दंडक्याने मारून खून केल्याचे समोर आले. अटक करण्यात आलेल्या चौघांनी खुनाची कबुली दिली असून, दोघांचा तपास सुरू आहे.