महाबळेश्वर :
निर्बंध लावूनही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने राज्यात कडक लॉकडाउन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या दोन दिवसात याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहीती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी महाबळेश्वरचे पोलीस निरिक्षक बी.ए कोंडुभैरी हे उपस्थित होते.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढु लागल्याच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज महाबळेश्वर पोलीस ठाण्यास भेट देऊन कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बन्सल यांनी शहरातुन फेरफटका मारून लॉकडाउनच्या नियमांचे महाबळेश्वरचे नागरीक किती पालन करतात याची माहीती घेतली. त्यांनी पोलीस ठाणे ते सुभाष चौक असा फेरफटका मारला. या वेळी काही जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू होती. तेथील दुकानदारांची बन्सल यांनी भेट घेवुन त्यांच्यासोबत संवाद साधला व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बन्सल म्हणाले, अनेक प्रयत्न करूनही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. ब्रेक द चेन साठी लॉकडाउन लागु केला तरी, कोरोना नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाउन लावण्याचे विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. लवकरच या बाबत घोषणा केली जाण्याची शक्यता त्यांनी बोलुन दाखविली. ज्यांचे वय 45 पेक्षा अधिक आहे, अशा नागरीकांनी कोरोनाची लस घ्यावी. कोरोना पासून बचाव करण्यासाठी लस आवश्यक आहे. तसेच आपल्या कडील लस ही पुर्णपणे सुरक्षित आहे. नागरीकांनी लस घेवुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.