कराड /प्रतिनिधी
नोव्हेंबर 2016 साली निवडणुका झालेल्या जिल्हय़ातील सातारा, कराडसह एकूण आठ नगरपालिकांचा पंचवार्षिकचा कार्यकाल रविवारी 26 रोजी संपला. त्यामुळे सोमवार 27 पासून या आठ नगरपालिकांमध्ये मुख्याधिकाऱयांकडे कार्यभार असणार आहे.
जिल्हय़ात नऊ नगरपालिका असून यातील मलकापूर वगळता सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर या आठ नगरपालिकांची पंचवार्षिक निवडणूक एकाच वेळी होती. 2016 साली नोव्हेंबर महिन्यात या आठ पालिकांची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर या पालिकांची पंचवार्षिक समाप्तीची तारीख 26 डिसेंबर 2021 असून फक्त महाबळेश्वरची तारीख 30 डिसेंबर 2021 अशी आहे. त्यामुळे सोमवारपासून या पालिकांमधील नगरसेवक राज संपुष्टात आले आहे. सोमवारपासून मुख्याधिकारीच पालिकेचा कारभार पाहणार आहेत. शासनाकडून प्रशासक नियुक्तीबाबत आदेश जारी होण्याची शक्यता असली तरी सुमारे दोनशेवर पालिकांची मुदत संपत असल्याने पालिकांचा कार्यभार मुख्याधिकाऱयांकडेच राहण्याची शक्यता आहे.
मुदत संपत असल्याने आठही पालिकांच्या कार्यक्षेत्रात शेवटच्या आठवडय़ात विकासकामांचे नारळ फोडण्यास वेग आलेला दिसत होता. आता नगरसेवकपद संपुष्टात आल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
कराडमध्ये कटुता कायम
कराड पालिकेतील गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकांचा अनुभव पाहता सत्ताधारी व विरोधी नगरसेवक शेवटची निरोपाची सभा आवर्जुन घेत. पाच वर्षात झालेली टीका, आरोप, प्रत्यारोप विसरण्याचे आवाहन करत नव्या सभागृहात पुन्हा येण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देत होते. यावर्षी हा शिरस्ता मोडल्याचे पाहावयास मिळाले. पालिकेची सर्वसाधारण सभा 11 नोव्हेंबरला झाली. त्यानंतर निरोपाची सभा घेण्याची वेळ हाती असतानाही व अनेक नगरसेवकांनी मागणी केली असतानाही केवळ ताळमेळ नसल्याने व कटुता कायम असल्याने ही सभा घेण्यात आली नाही. शेवटपर्यंत सभागृहातील वातावरण खेळीमेळीचे दिसले नाही. केवळ कुरघोडय़ा, श्रेयवाद, अल्पमत, बहुमत याच्या खेळातच पाच वर्षे सरल्याचे दिसत आहे. शेवटच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमातही सर्व आघाडय़ा एकत्रित दिसल्या नाहीत.