प्रतिनिधी/ सातारा
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात कोरोना बाधितांची संख्या सातारा जिल्हय़ात वाढली आहे. मार्चपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पाच-सहा दिवसांपासून 200 ते 300 च्या पटीत वाढ होत आहे. मात्र, काही वेळा ही वाढ 100 च्या खालीही घसरत आहे. हॉटस्पॉट सातारा, कराडसह खंडाळा, फलटण, खटाव येथे सातत्याने दोन अंकी संख्येने रुग्ण वाढत आहेत उर्वरित पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई तालुक्यात एक अंकी बाधित वाढ आहे.
संसर्ग वाढीचा आलेख वाढता असतानाच कोरोनामुक्तीचा आलेखही वाढता असल्याचा दिलासा घेत कोरोनाविरुध्दची लढाई सुरुच असून आज या लढाईला एक वर्ष पूर्ण होत आहे. गतवर्षी 23 रोजी जिल्हय़ात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला त्याला त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, जिह्यात सोमवारी सांयकाळी तब्बल 177 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
गेल्या 14 दिवसातील संसर्ग स्थिती अशी
6 मार्च ते 21 मार्च या 14 दिवसातील स्थितीचा आढावा घेतला तर दररोज 2 हजार 500 चाचण्या सुरु असून 31 हजार 583 एवढय़ा चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये 2 हजार 629 जण बाधित समोर आले तर त्यापैकी 2 हजार 160 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 14 दिवसात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात पॉझिटिव्हीटीचा दर 8.32 टक्के, मृत्यूदर 0.83 टक्के तर कोरोनामुक्तीचा 82.16 टक्के एवढा दिलासादायक राहिला आहे. काही गावांमध्ये अचानक बाधित रुग्ण वाढले पण ती गावेही सावरली आहेत.
जिल्हय़ात स्थिती आटोक्यात पण
सध्या जिल्हय़ात एकूण बाधितांची संख्या 62 हजार 439 एवढी झाली असली तरी त्यापैकी 58 हजार 366 जणांनी कोरोनावर मात करत लढाईला बळ दिले आहे. सध्या उपचारार्थ रुग्ण संख्या 2 हजार 186 एवढी असली तरी प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेत असल्यांची संख्या 500 च्या आसपास आहे. उर्वरित रुग्ण जिल्हय़ात होमआयसोलेट असून त्यांनी नियम पाळण्याची गरज आहे. तसेच वाढता संसर्ग आटोक्यात येण्यासाठी अजून काही महिने तरी मास्क, हातांची स्वच्छता व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावाच लागणार आहे तर लॉकडाऊनसह कोरोनाचे संकट टळता येईल.
तालुकानिहाय बाधित वाढीचा वेग वेगवेगळा
बाधित कधी अचानक 300 चा आकडा ओलांडत आहे तर कधी ती 100 च्या आसपास येत आहे. शनिवारी अचानक 327 चा बाधित वाढीचा आकडा समोर आल्यानंतर स्थिती चिंताजनक झाली असताना मात्र रविवारच्या अहवालात बाधित वाढ मंदावली. रविवारी 133 जणांचा अहवाल बाधित आला असून यामध्ये सातारा, फलटण, कोरेगावात रुग्ण संख्या अधिक असल्याने त्यांना काळजी घ्यावी लागणार असून कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी गावात 21 बाधित समोर आले आहेत. पाच तालुक्यात दोन अंकी तर पाच तालुक्यात नगण्य संख्येने बाधित वाढ समोर आलीय.
जिल्हय़ात 4 बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे खुबी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, चिकलगुठन जि. सांगली येथील 70 वर्षीय पुरुष, वाडी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष व फलटण येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 कोविड बांधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.