मद्यपी तरुणांची गावात दहशत, मारहाणीत पिता पुत्र जखमी, खंडाळा पोलिसात तक्रार दाखल
सातारा / प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील कर्णवडी गावाच्या जत्रेत छबिना निघण्यापूर्वी मंदिरात सफाई करणाऱ्या पुजाऱ्यास व त्यांच्या मुलास गावातील मद्यपी युवकांनी बेदम मारहाण केली. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे. गुरव पिता पुत्र या मारहाणीत जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पालघर येथे साधू हत्याकांड घडले होते. तसाच काहीसा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला असून सुदैवाने पुजारी केवळ जखमी झाले आहेत.
नुकतीच मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कर्णवडी येथील वार्षिक यात्रा होती. यात्रेत मंदिरापासून देवाचा छबिना निघतो. तत्पूर्वी काळ भैरवनाथ मंदिराची स्वच्छता मंदिराचे पुजारी दि.15 रोजी रात्री 10 वाजता करत होते. त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात अक्षय सुतार, शुभम सुतार हे दोघे दारू पिऊन आले. त्यांनी सफाई नंतर कर, अगोदर शिंग वाजव असा आग्रह धरला. अशोक गुरव यांनी शिंग वाजवले. मनासारखे शिंग वाजवले नाही म्हणून दोघांनी गुरव यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत अशोक गुरव आणि त्यांचा मुलगा अमोल गुरव हे जखमी झाले असून ही बाब कर्णवडी ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी गुरव यांनाच माफी मागून पोलिसांत दिलेली तक्रार माघारी घेण्यास दबाव टाकला आहे. तक्रार माघार न घेतल्यास गावाच्यावतीने कारवाई करण्याची धमकी दिली असल्याची माहिती अमोल गुरव यांनी दिली आहे. या घटनेनंतर गुरव परिवार दहशतीखाली असून प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत खंडाळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुन्हेगारांना वचकच राहिला नाही
सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बोकाळली आहे.कायदा लवचिक असल्याने ज्यांच्यावर अन्याय होतो तो ही आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला जातो आहे.सातारा जिल्ह्यात वाईमध्ये छेडछाड झालेल्या युवतीवर आणि तिच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होते.कर्णवडी येथे तर पुजाऱ्याला मंदिराच्या गाभाऱ्यात मारहाण होते.यावरून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही याचीच चर्चा सुरू आहे.