प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात 16 हजार पेक्षा जास्त नागरिक कोरोना मुक्त झाले आहेत. नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी. जिल्हा परिषदेचे कोरोनाबाधित झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नाविन्य पूर्ण उपक्रम म्हणून विशेष यंत्रणा उभारून काळजी घेण्यात येत आहे. सर्व बाधित कर्मचाऱ्यांनी या यंत्रणेतील नियुक्त असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सर्व माहिती वेळेवर देऊन आणि सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलासा व मार्गदर्शन मिळावे म्हणून तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर यंत्रणा उभारली आहे दूरध्वनीवरून त्यांचे समुपदेशन करून मार्गदर्शन दिले जात आहे. त्याचा फायदा करून घ्यावा सहकार्य करावे. सर्व प्रकारची काळजी घ्यावी मार्गदर्शन केले जात आहे. त्याप्रमाणे काटेकोरपणे नियम पाळावेत असे देखील या पत्रकात म्हटले आहे. अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, आशा वर्कर्स, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी सातत्याने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्ष समाजात मिसळून काम करत असतात. त्यांचे संरक्षण खूप महत्त्वाचे ठरते म्हणूनच हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 16 हजार पेक्षा जास्त नागरिक पूर्णतः बरे झाले आहेत. त्यामुळे या बाधित कर्मचाऱ्यांनी आत्मविश्वास बाळगून पूर्ण खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील या पत्रकात केले आहे. होम आयसोलेशन असेल तर कोणती काळजी घ्यावी याबाबत सर्व ते मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये देखील काय काळजी घ्यावी याचे समुपदेशन केले जात आहेत. सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन करण्यासाठी यंत्रणा कटिबद्ध आहे. तालुकास्तरावर एक तसेच जिल्हा स्तरावर दोन अथवा तीन तालुक्यांसाठी खास अधिकारी नेमण्यात आले आहेत.