जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जिल्हा काँग्रेसची निदर्शने
प्रतिनिधी / सातारा
अगोदर शेतकरी अडचणीत आहे. त्यातच शेतकऱ्यांना कांद्यातून भाव मिळत होता.मात्र, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली आहे. त्यावरून कांदा उत्पादक शेतकरी वर्गाचे दिवाळे काढण्याचा निर्णय घेतला आहे तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात धनश्री महाडिक, नरेश देसाई, अनवर खान यांच्यासह मोजके कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कोठे चांगला भाव येऊ लागला होता. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती. पण केंद्र सरकारने अचानकपणे निर्यात बंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 4 जून 2020 रोजी कांदा, बटाटा, डाळी यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून टाकल्याची घोषणा केली होती.परंतु तीन महिन्यात घुम जावं करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.यामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.तत्काळ निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी केली आहे.