पावसाळ्यात बामणोली व कास परिसरातील गावांचा वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर…
मातीच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी
वार्ताहर / कास
कास तलाव शेजारील कास बामणोली हा मुख्य रस्ता धरणाच्या भिंतीच्या बांधकाम क्षेत्रात बाधित झाल्याने जवळुनच त्याला पर्यायी पक्का रस्ता निर्माण करणे गरजेचे होते मात्र, अद्याप त्याठिकाणी पर्यायी पक्का रस्ता नसल्याने गेल्या दोन वर्षापासून मातीच्या रोडवरुन वाहतुन सुरु आहे. मात्र, आता पावसाळा जवळ आला असून धरणाचा नवा सांडवा व नवीन पुलाचे कामही उर्वरीत काळात पुर्ण होणे कठीण असल्याने वाहतुक जुन्या पुलावरून चालु करुन मातीच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांमधुन होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना ह्या धरणाच्या भिंतीवरून मुख्य सातारा-कास बामणोली रस्त्याला जोडण्यासाठी पूलाचे काम चालू आहे. सद्यस्थितीत हा पूल प्राथमिक अवस्थेत असून हा पूल पाऊस सुरु होण्यापूर्वी पुर्ण होण्याची गरज आहे. जेमतेम पंधरा दिवस ते तीन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असून एवढ्या दिवसात पूलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. रस्ता पक्का करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदाराकडून सांगितले जात असले तरी पावसापूर्वी ही सर्व काम न झाल्यास बामणोलीसह कास परिसरातील गावांचा वाहतुकीचा प्रश्न अडचणीचा ठरणार आहे.
रोडवरील चिखलात भात लागण करण्याची वेळ येऊ नये
कास धरणावरील रस्ता पक्का न झाल्यास मातीच्या रस्त्यावर चिखल निर्माण होऊन वाहतुक ठप्प होऊन भागातील जनजीवन ठप्प होईल रोडवरील चिखलात भात लागण करण्याची वेळ येऊ नये ? वेळ हातात आहे तोच येथील रस्ताचे डांबरीकरण करून वाहतुक सुरळीत करावी.
धनाजी संकपाळ, अध्यक्ष भैरवनाथ बोट क्लब बामणोली