वार्ताहर / कास
कास पठार हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्टअसुन युनेस्कोचे नामांकन मिळाले आहे. नामांकन टिकवायचा असेल तर कास पठाराचे संवर्धन होणे गरजेचे असुन कास पठार ते सह्याद्री नगर हा शिवकालीन मार्ग खुला केल्यास या मार्गावर अनेक अवैद्य प्रकार सुरू होऊन वनसंपत्ती ला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शिकारीचे प्रमाण वाढू शकते. अशा अनेक निसर्गाला धोकादायक गोष्टी या परिसरात घडू शकतात त्यामुळे हा जो राज मार्ग बंद आहे तो तसाच राहावा असा ठराव कास पठार कार्यकारी वनसमितीच्या दिनांक 30 जून 2021रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
पर्यटन विकास झाला पाहिजे परंतु आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की कास पठाराचा फक्त काहीच भाग पर्यटकांसाठी खुला आहे. अनेक हेक्टर परीसर आज निर्जन आहे.या भागात स्थानिक गूराखी त्यांची जनावरे आणि वन्यजीव यांचाच वावर आहे आणि तो भाग निर्मनुष्य राखला गेल्याने त्या विषयी पर्यटकांना गुढ आकर्षण वाटते.जर या भागातून डांबरी रस्ता गेला तर नेहमीच वाहनांची वर्दळ राहुन निसर्गाचा वेगळेपणा नष्ट होईल येथील निरव शांतता आणि एकांत हाच मुख्य पर्यटकांना हवा हवासा वाटतो. तेवढा परीसर तरी मानवी हस्तक्षेपापासून दुर राहिला पाहिजे. आपण नुसते विकास करायच्या मागे धावलो तर ज्या आल्हाददायक वातावरणासाठी पर्यटक येतात ते वातावरण नष्ट तर होत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.
या मार्गावर कोणतीही मानवीवस्ती नाही सर्व आजूबाजूच्या गावांना जाण्यासाठी पर्याय डांबरी रस्ते उपलब्ध आहेत. तरी सुद्धा काही लोकांना हा रस्ता का खुला करावयाचा आहे. कास पठारावरील वनसंपदा टिकली तरच भविष्यात पर्यटन वाढणार आहे वनसंपदा नष्ट झाली तर पठार चे अस्तित्व धोक्यात येऊ शकते त्यामुळे हा रस्ता बंद आहे तो तसाच बंद ठेवून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कास पठार कार्यकारी वनसमिती व स्थानिक लोकांनी केली आहे.
आपण विकासाच्या नावाखाली सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तर नष्ट करत नाही ना.. याचेही भान ठेवुन निसर्गाचे जतन केले पाहीजे विकास तर झाला पाहिजे पण तो पठाराच्या आजुबाजुला राहणार्या लोकांचा, तेथील लोकांना बारमाही रोजगार मिळाला पाहिजे.. यासाठी दोन्ही बाजूला पर्यायी रस्ते तयार झाले आहेत.. त्यांची रुंदी वाढवून दर्जा सुधारावा.अनेक जण हॉटेल, रिसॉर्ट ची निर्मिती टप्प्याटप्प्याने करत आहेत… अनेक भुमीपुत्र आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने व्यावसायिक होत नाहीत बँकांनी या भागात जाचक अटी न ठेवता काही सौम्य अटींवर पथपूरवठा केला तर अजून पर्यटकांना राहण्याच्या सुविधा निर्माण होतील.. पर्यायाने विकास होत जाईल आणि पर्यटक जास्त संख्येने येतील.. भागात सगळीकडे फिरतील…आणि आर्थिक उन्नती स्थानिक सर्वांचीच होत जाईल – सोमनाथ जाधव – वनसमीती सदस्य’.