वार्ताहर / कास :
कास परिसरात विघ्नसंतोषी लोंकाकडून वणवे लावून चाऱ्यासह वनसंपदेची होरपळ करण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी कास तलाव कासाणी वाहनतळ परिसर व अनावळे गणेशखिंड परिसरातील वनसंपदा अज्ञाताने लावलेल्या वणव्यात होरफळली असून, कास वनसमितीच्या कर्मचाऱ्यांनी कास तलाव व कासाणीकडील वनवा शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणल्याने अन्य वनसंपदा वाचवण्यात त्यांना यश आले.
कास परिसर निसर्गसंपदेने नटला असून या परिसरात दरवर्षीच उन्हाळ्यात विघ्नसंतोषी लोकांकडून वणवे लावून वनसंपदेची होरपळ केली जाते. मात्र, अद्याप कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. यावर्षी चारा संपुर्ण वाळला नसतानाच वणवे लावण्यास प्रारंभ झाल्याने सुकलेल्या चाऱ्यासोबत ओल्या चाऱ्यासह वृक्षांची होरफळ होऊ लागली आहे. रविवारी लागलेल्या वनव्यात कास तलाव परिसर कासानी गावाकडील वाहनतळ परिसर व कास रोड लगतच्या गणेश खिंड परिसरातील 30 हून आधिक एकरच्या क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे.
कास वनसमितीच्या योगेश काळे, आभिषेक शेलार, सिताराम बादापुरे, सुजित जांभळे विठ्ठल कदम, प्रदीप शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत कास तलाव वाहनतळ परिसर व कासाणी गावाकडील वाहनतळ परिसरातील वनवा आटोक्यात अणल्याने काहीशी वनसंपदा वनव्याच्या होरपळीतुन वाचवण्यात वनसमितीच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
अभिषेक शेलार, कर्मचारी – कास पठार कार्यकारी वनसमिती
वणव्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. कित्येक झाडे आगीत नष्ट होऊन वातावरणात तापमानाचे प्रमाण वाढू लागले आहे. भुजल पातळी देखील अत्यल्प होत आहे. तसेच या परिसरात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होत असुन परिसरातील कित्येक जण हा रानमेवा विकून अर्थार्जन करत असतात. परंतु वणवे लागत असल्याने रानमेवा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वणवा लागणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊन पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करावे हे आपले कर्तव्य आहे.