म्हसवड : शेतजमीन कब्जे वहिवाटीत वर्षानुवर्षे असलेल्या कुळ हक्क शेतकरी बांधवांचे दहिवडी नंतर म्हसवड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरूच असून, आंदोलनाचा आज विसावा दिवस होता.
जवळपास दीडशे वर्षापूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतजमिनी मोठ्या संख्येने शेतकरी कसत आहेत. सातबारा सदरी रेषेच्यावर येथील सरंजामांची व रेषेच्याखाली कुळ असलेल्या शेतकरी बांधवांची नोंद आहेत.सरंजामांची पोकळ नोंद असलेली नावे कमी करुन कसेल त्याची जमीन या कायद्याअंतर्गत आम्हा कुळधारक शेतकर्याचीच नावे सातबारा सदरी नोंद करुन आमच्या हाती सातबारा जोपर्यंत दिला जात नाही, तोपर्यंत श्रमिक मुक्ती दल अंतर्गत डॉ.भारत पाटणकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी बांधवांनी घेतला आहे.
‘कसेल त्याची जमिन’ या धर्तीवर गेल्या ६५ वर्षात सरकारने वेळोवेळी अनेक कायदे करुनही कुळांच्या शेतजमिनीच्या सातबारा सदरी येथील सरंजामांची नोंद असलेली नावे कमी न करता तशीच बेकायदेशीरपणे ठेवली गेली. पुढे सातबारा सदरी त्यांची मालकी हक्काची आणेवारी नोंद नसताना १६ आण्याची जादा बेकायदेशीर आणेवारी नोंद करुन हा सातबारा ३२ आण्याचा करण्यात आलेला आहे.
सरकारने वेळोवेळी कुळ हक्काबाबत कायदे केले. परंतु, म्हसवड भागातच त्याची योग्य न्याय पध्दतीने महसुल कर्मचारी व अधिकारी यांनी अंमलबजावणीच केलीच नसल्यामुळे कुळ व सरमजाम यांच्यात जमिन मालकी हक्काचा वाद सरकारच्या चुकीमुळेच उफाळलेला आहे.