सातारा / प्रतिनिधी :
वाई भाजप आता नव्याने करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्याचे महत्व पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचली आहे. यावेळी भाजपचे वाई शहर अध्यक्ष राकेश फुले, जिल्हा चिटणीस यशवंत लेले, शहर सरचिटणीस देवानंद शेलार, सरचिटणीस सचिन गांधी, सरचिटणीस मनीषा घैसास, जिल्हा कार्यकारिणी सदस्य काशीनाथ शेलार, सातारा जिल्हा महिला सरचिटणीस ज्योती गांधी, शहर उपाध्यक्षा सुश्मिता जैन, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष अरविंद बोपर्डीकर उपस्थित होते.
यावेळी राकेश फुले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेती उत्पन्न बाजार समितीच्या जाचक अटी व नियमातून बाहेर काढून अडत व दलालांच्या कचाट्यातून त्यांची सुटका करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी तीन नवीन कायदे केले.1) शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 2) शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 20203) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020, हे कायदे सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत.
सध्या महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा कायदा तसा तोट्याचा आहे हे खोटेपणाने पटवून देत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांमधील समज गैरसमज दूर करण्यासाठी शिवार भेटीच्या माध्यमातून भाजप वाई शहरात वेगवेगळ्या एकूण 3 ठिकाणी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची शेतशिवारात भेट घेतली आणि नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फक्त फायद्यासाठी कसा आहे हे पटवून दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे वाई शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.