पत्रकार परिषदेत काँग्रेसवर साधला निशाणा
कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे
प्रतिनिधी / सातारा
सध्या शेतात सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यात पावसाने लगबग धांदल होत असताना चक्क केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी हितगुज करतात. त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना कृषी विधेयक कसे चांगले हे समजून सांगितले. दरम्यान, रात्रीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट कृषी विधेयकवरून काँग्रेस चुकीची बोंब मारत फिरत आहे. शेतकऱ्यांच्या हिताची दोन्ही बिले आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
शेतकरी शिवार संवाद दौरा ग्राहक संरक्षण व अन्नपुरवठा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. नागठाणे येथील शेतकर्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषी विधेयकाविषयी माहिती दिली. कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कसे चांगले व हितकारक आहे यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या व शेतकऱ्यांच्या फायद्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येईल, कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर होण्यास मदत करण्यात येईल, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळेल. इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध होईल आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल.
5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटांचा फायदा होईल. बाजारपेठेतल्या अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर नाही त्यांच्या कंत्राटदारांवर राहिल. मध्यस्थांना दूर केल्यामुळे शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतील. निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल. किमती स्थिर राहण्यात मदत होईल. ग्राहक-शेतकरी दोघांचा फायदा अशा पद्धतीने सातारा तालुक्यात शिवारफेरी केल्याने सर्व शेतकरी वर्गाला कुतूहल व अभिमान वाटला यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार व सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांनी कृषी विधेयकासंदर्भात साताऱ्यातील शेतकरी राजा आनंदी व समाधानी असल्याची माहिती दिली शेतकऱ्यांनी नागठाणे हे गाव आले या पिकासाठी बियाणे, आयात-निर्यात, व्यापार यासाठी प्रसिद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. भागवत कराड, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, किसान मोर्चा अध्यक्ष हेमंत शिंदे, तालुका उपाध्यक्ष हर्षल निकम, व्यापार आघाडी अध्यक्ष नवनाथ तिंबोळे, शेतकरी वर्ग, नंदकुमार नलवडे, श्रीरंग मोरे, राम साळुंखे नागठाणे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा
सायंकाळी उशिरा सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी सांगितले की शेती सुधारणा विषयी दोन बिले ही लोकसभेत मंजूर करण्यात आली. राज्यसभेत भाजपचे संख्याबळ नसल्याने काँग्रेसने हे बिल मंजूर होणार नाही याकरिता विरोध करण्याचे कारण मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे असे होते.ते कृषी मंत्री तोमर यांनी दिले होते.परंतु चुकीची माहिती संसदेच्या बाहेर सांगून बिलाचा अपप्रचार काँग्रेसने चालवला आहे, अशी टिप्पणी केली.यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.