नवारस्ता / प्रतिनिधी
संततधार अतिवृष्टी सुरू झाल्याने २२ जुलै रोजी सुरू करण्यात आलेले कोयना धरणाचे पायथाविजगृह गुरुवारी २९ दिवसांनंतर बंद करण्यात आले. दरम्यान कोयना धरणात ९२.७० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात २२ जुलै पासून अतिवृष्टीला सुरवात झाली अन् अवघ्या दहा दिवसांत धुव्वाधार पाऊस कोसळायला सुरवात झाल्याने पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. आणि दहा दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्याने नव्वदी ओलांडली.त्यामुळे २२ जुलै पासून च धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सलग बारा दिवस उचलून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
दरम्यान सध्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला असल्याने २२ जुलै रोजीच सुरु करण्यात आलेले धरणाचे पायथा विजगृह सलग २९ दिवसांनंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात आले. दरम्यान गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत कोयनानगर येथे ३(३५२१) मिलिमीटर नवजा येथे ९ (४५५७) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे ९ (४७३९)मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणात प्रतिसेकंद ५ हजार २८८ क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे तर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसी इतका झाला आहे तर धरणाची पाणीपातळी २१५३ फूट ०९ इंच इतकी झाली आहे.