दहा दिवसांत नवीन रुग्ण नाही
वार्ताहर / औंध
कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हवालदिल झालेल्या औंध ग्रामस्थांनी स्वयंशिस्त पाळून कडकडीत लॉकडाऊनची अंमलबजावणी करत कोरोनाची साखळी तोडण्यात ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. गेल्या दहा दिवसांत एकही नवीन रुग्ण औंधमध्ये सापडलेला नाही.
तब्बल चार महिने कोरोनाचा यशस्वी मुकाबला करणाऱ्या औंधवासियांना गेल्या महिन्यात कोरोनाने चकवा दिला. अचानक रुग्णांची संख्या 32 वर गेली होती. वाढत्या रुग्णामुळे औंध हॉटस्पाट होतेय किंवा काय अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता कर्फ्यू हा एकच पर्याय असल्याने ग्रामस्थांनी सर्वानुमते दहा दिवस लाकडाऊन पाळून साखळी तोडण्याचा निर्णय घेतला. स्वयंशिस्त पाळून सर्वांनी अत्यावश्यक सेवा वगळता संपर्क टाळण्यावर भर दिला.
ग्रामपंचायतीच्या वतीने बाधीत झालेल्या रुग्णांच्या परिसरात औषध फवारणी करुन परिसराचे निर्जंतुकिरण केले. आरोग्य सेविका आशा, अंगणवाडी सेविका यांनी देखील घरभेटी देऊन लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच काही लक्षणे दिसतात काय याची माहिती घेतली. सर्वांनी एकदिलाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. नवीन बाधित रुग्णांची साखळी तुटल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही सर्वांनी प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली तर कोरोनाला पुन्हा एकदा गावाच्या बाहेर रोखणे शक्य होणार आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालाने ठोका चुकतोय.
कोरोना रुग्णांचा दैनंदिन अहवाल आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध केला जातो. यामध्ये रुग्ण नसताना यादीत औंधचे नाव येणे तसेच रुग्णाचा म्रुत्यु, अशा प्रकारच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र साखळी खंडित होणे आवश्यक होते. याकरिता सर्वांनीच एकदिलाने जनताकर्फ्यु राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वांनी स्वयंशिस्त पाळल्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यात यश आले आहे. यापुढे देखील लोकांनी स्वयशिस्त पाळून प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
– सोनाली मिठारी, सरपंच ग्रामपंचायत औंध.