प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदरामुळे साताऱ्यातील कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी आणखी सहा दाहिन्या तयार करण्यात येणार आहे. सध्या या स्मशानभूमीत कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी दहा दाहिन्या आहेत. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सातारा जिह्यातील अनेक जण उपचारासाठी शहरात येत असतात. साताऱ्यात येणाऱ्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास हिंदू धर्मियासाठी अंत्यसंस्काराची सोय कैलास स्मशानभूमी येथे तर मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानमध्ये करण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने एक पथक खास अंत्यसंस्काराकरता नेमण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात किंवा अन्य रुग्णालयात कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यावर नियम व शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर त्या पथकाच्या ताब्यात मृत्यदेह दिला जातो. नातेवाईकांना शेवटचे मुखदर्शन दिले जाते. अन् त्यानंतर विधीवत पद्धतीने कैलास स्मशानभूमीत पथक अंत्यसंस्कार केले जातात.
एका अंत्यसंस्कारासाठी आठ तासाचा वेळ लागतो. तीन तास मृत्यदेह जळण्यासाठी लागतो. त्यानंतर पाच तास ती दाहिनी मोकळी ठेवून तेथील रक्षा काढून नातेवाईकांच्याकडे ताब्यात रक्षा विसर्जनासाठी देण्यात येते. एका दिवसात दोन शिपमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. त्याकरता पालिकेचे बारा कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदरामुळे कैलास स्मशानभूमीवर ताण आलेला आहे. त्यामुळे सहा दाहिन्या लवकरच तयार करण्यात येणार आहेत. सामान्य रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी दहा दाहिन्या वेगळ्या आहेत.