वाई / प्रतिनिधी :
वाई शहरात कोरोनोचा शिरकाव होऊ नये, यासाठी वाई पोलीस ठाण्यामार्फत किसनवीर चौकात विनामास्क फिरणार्या वाहन चालकांसह पादचार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रोगाने पुन्हा थैमान घालण्यास सुरवात केली आहे. त्याचा शिरकाव वाई शहरासह तालुक्यातील गावागावांमध्ये होऊन रुग्ण संख्येत वाढ होऊ नये, याची खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दि. 17 रोजी पी.एस.आय राजेंद्र कदम, हवालदार मुकुंद माळी, महीला पोलीस सोनाली माने, रुपाली भोसले, अर्चना पवार, वैशाली चव्हाण यांचे पथक तयार करून त्यांना वाईच्या नागरिकांची वर्दळ असलेल्या किसनवीर चौकातून विना मास्कचे फिरणारे दुचाकीस्वार पादचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या या पथकाने प्रत्येकी 500 रुपये दंड आकारुन केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे काही तासातच तब्बल 12 हजार रुपयांचा महसूल गोळा केला.
नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मास्कचा वापर करुन समांतर अंतर ठेवणे आवश्यक आहे. काल झालेल्या कारवाईतून नागरिकांमध्ये सुधारणा होणार नसेल तर ही मोहिम अधिक तीव्र करावी लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला.