प्रतिनिधी/ कराड
सातारा-कोल्हापूर महामार्ग यापुढे महापुराच्या पाण्यात बुडणार नाही, यासाठी सातारा-कागल सहापदरीकरणाच्या कामात तिन्ही जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात. त्या विचारात घेऊन महामार्ग महापुराच्या पाण्यात बुडणार नाही, अशा पद्धतीने बांधण्यात येतील. पश्चिम महाराष्ट्राने आता मेट्रो प्रकल्प हाती घेण्याबाबत विचार करावा. तसेच कोल्हापूर ते सांगली हा रस्ता राज्य शासनाने बीओटीवर केला होता. मात्र हे काम फेल गेल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केली.
सातारा-कागल सहापदरीकरणासह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हय़ातील सुमारे सहा हजार कोटी रूपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांचे लोकार्पण व कोनशिला कार्यक्रम येथे फर्न हॉटेलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. सातारा जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार संजय मंडलिक, खासदार संजयकाका पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह तिन्ही जिल्हय़ातील आमदार व्यासपीठावर उपस्थित होते.
खंबाटकीच्या दुसऱया टनेलचे वर्षात उद्घाटन होईल
कोरोनामुळे तिन्ही जिल्हय़ातील रस्ते कामांचा कार्यक्रम कराडला होत आहे. यासाठी येथील सर्व खासदारांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मी महाराष्ट्रात मंत्री असताना खंबाटकी घाटातील दोन्ही टनेल बांधण्याची संधी मला मिळाली. लोकांचा प्रश्न सुटला. आता खंबाटकीत दुसरा टनेल बांधण्याचे काम सुरू आहे. 22 टक्के काम झाले आहे. सातारचे पालकमंत्री व खासदार यांनी या भागातील शिवाजी पुतळा व दोन, तीन गावांच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवून द्यावा. तर या टनेलच्या उद्घाटनाला पुढच्या बारा महिन्यात येईन, असे गडकरी म्हणाले.
कोल्हापूर-सांगली रस्त्याचा डीपीआर बनवण्याच्या सूचना
कोल्हापूर ते सांगली रस्ता महाराष्ट्र शासनाने बीओटीवर बनवला होता. मात्र हे काम योग्यरितीने झालेले नाही. महाराष्ट्र शासनाने हा रस्ता महामार्ग विभागाने करण्याबाबत मला पत्र दिले आहे. त्यानुसार या रस्त्याचा डीपीआर बनवण्याच्या सूचना मी आताच दिल्या आहेत. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात आपण या रस्त्याचे भूमिपूजन करू. हे अडचणीचे काम होते. ते आता मार्गी लागेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कराड परिसरात 5 हजार कोटींची कामे होणार असून कराडलगत मोठा उड्डाणपूल होणार आहे.
महामार्ग विभाग-लोकप्रतिनिधींची मिटींग बोलवा
महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कोल्हापूरला मिंटींग बोलवावी. या मिटींगला तिन्ही जिल्हय़ातील आमदार व खासदारांना निमंत्रित करावे. पालकमंत्री सतेज पाटील आणि बाळासाहेब पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. या रस्त्याच्या कामाच्या आराखडय़ाचे सादरीकरण महामार्ग विभाग व कन्सल्टंट करतील. यात लोकप्रतिनिधींच्या सूचना घ्या. त्याचा समावेश करून काम सुरू करा. काहीही झाले तरी हा रस्ता महापुराच्या पाण्यात बुडणार नाही, याची खात्री मी देतो. त्यामुळे लोकांची फार मोठी सोय होईल, असे ते म्हणाले.
सांगली-कोल्हापूरला पुन्हा येईन
सांगली व कोल्हापूरच्या कामांचीही कोनशिला येथे झाली. प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघात कार्यक्रम व्हावा, असे वाटत असते. मात्र कोरोनामुळे आपल्याला मर्यादा आहेत. मात्र नाराज होऊ नये. सांगली व कोल्हापूरला आणखी 10 त 20 हजार कोटींचा निधी देईल व मी पुन्हा कोल्हापूरला येईन, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच पुढचा कार्यक्रम कोल्हापूरला घेण्याची सूचना केली.
मेट्रोने कोल्हापूर-पुणे केवळ पावणेतीन तासात
उत्तर भारतातून येणारी वाहतूक सुरतमार्गे मुंबईत येते. तेथून पुणे व सोलापूरमार्गे जाते. त्यामुळे आम्ही सुरतहून नवा रस्ता बांधतोय. सुरतमधून तो सुरू होईल. नाशिकवरून अहमदनगर, सोलापूरमार्गे दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र तेलंगणा असा 40 हजार कोटींचा रस्ता प्रकल्प करतो आहोत. देशात वाहनांची संख्या वाढत आहे. मी स्वतः मेट्रो डिझाईन केली आहे. ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी असेल. तिचे स्पीड ताशी 140 असेल. प्रत्येक स्टेशनवर एका मिनिटासाठी थांबेल. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर केवळ पावणेतीन तासात पूर्ण होईल. उद्योजकांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा. हा प्रकल्प दिशादर्शक असेल. तीन वर्षात पैसे वसूल होतील, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात जलमार्गाचा विकास व्हावा
खरं तर माझे पहिले प्राधान्य जलमार्ग आहे. मी देशात 102 जलमार्ग निश्चित केले होते. यातील गंगा जलमार्ग, वाराणसी, बंगालच्या खाडीत जलवाहतूक सुरू झाली. महाराष्ट्रात जलमार्गाचा विकास व्हावा, असे वाटते. कृष्णा, कावेरी अशा सर्व नद्यांमध्ये जलवाहतूक सुरू होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. देशात पाण्याची कमी नसून नियोजनाची कमी आहे. 1970 पासून पाण्याबाबतचे 17 लवाद होते. यातील 11 लवाद मी जलसंपदा मंत्री असताना सोडवले. यात कर्नाटक व महाराष्ट्र लवाद प्रयत्न करूनही सुटला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गोदावरी नदीचे पाणी कृष्णेत, कृष्णेचे कावेरी नदीत, कावेरीचे पेनारमध्ये वळवण्याचीही योजना हाती घेतली होती, असे ते म्हणाले.
अपघातांचे प्रमाण कमी करणार
दिल्लीत मी महाराष्ट्राचा ऍम्बेसिडर म्हणून काम करत आहे. सुमारे 40 लाख कोटींची वर्क ऑर्डर दिली. पण एकाही ठेकेदाराला बोलावले नाही. ठेकेदारांना त्रास देऊ नका, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. मुंबई – पुणे रस्त्यावरील 50 टक्के अपघात सेव्ह लाईफ फौंडेशनच्या सहभागाने कमी केले. आता या फौंडेशनचे आणखी सहकार्य घेऊन अपघात कमी करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे गडकरी यांनी शेवटी सांगितले.
प्रकल्पांना राज्य सहकार्य-पालकमंत्री बाळासाहेब पाटील
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, शेंद्रे ते कागल हा रस्ता 14 साली होणे अपेक्षित होते. मात्र त्याला थोडा उशीर झाला. आज या परिसरात या कामांचा शुभारंभ होत आहे. या कामांना सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घ्यायला हवा. रस्ता म्हटले की हल्ली गडकरी साहेबांचे नाव असते. ते जे प्रकल्प सुचवतील त्याला त्या प्रकल्पांना राज्य सरकारचे सहकार्य निश्चित असेल.
राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी प्रास्ताविक केले. राजीव सिंग यांनी आभार मानले. आमदार सर्वश्री शिवेंद्रराजे भोसले, ऋतुराज महाडीक, जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, सदाभाऊ खोत, महेश शिंदे, सुमन पाटील, सुधीर गाडगीळ, मानसिंग नाईक, आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.