जावली बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
वार्ताहर / कास
कोयना भाग ३८ गाव विभागातील गावे जावली तालुक्याला जवळून जोडणारा रस्ता म्हणजे मेढा-कुंसुंबी-कोळघर-अंधारी हा होय. हा रस्ता मेढ्यातून कोळघर मार्गे अंधारी गावातून आल्यावर पुढे मुख्य सातारा-कास-बामणोली या रस्त्याला मिळतो. मात्र, हाच रस्ता अंधारी फाट्यापासून ते कोळघर गावाच्या बाजूला साधारणपणे तीन ते चार किमी पूर्णपणे उखडला आहे. अंधारी हे गाव मेढा कोळघर बामणोली या रस्त्यात येत असल्याने वरील पट्ट्यातील मुनावळे, कळकोशी, फळणी, उंबरी चोरगे, उंबरी जाधव, कास, कोळघर या गावांची मुख्य बाजारपेठ आहे.याच बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे उखडल्याने पुणे, मुंबई या ठिकाणाहून मेढा कोळघर मार्गे वासोट्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या खुप मोठ्या प्रमाणावर येत असल्याने धुरळा खूप मोठ्या प्रमाणावर उडत आहे. तो धुरळा गावातील घरांमध्ये जात असल्याने गावातील लहान मुले, वृद्ध व इतर लोक याना श्वसनाचे विकार जडायला सुरुवात झाली आहे.
जावली बांधकाम विभागाकडे अंधारी-कास ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र पांडुरंग शेलार यांनी वारंवार पत्रव्यवहार व फोनवरून संपर्क करून पाठपुरावा करून सदरचा रस्ता डांबरीकरण करणेबाबत सूचना केल्या आहेत मात्र जावली बांधकाम विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करत आहेत. महत्वाचे म्हणजे अंधारी फाटा ते अगदी कोळघर गाव या रस्त्याच्या कडेला जिओ कंपनीची वायर देखील खुदाई करून टाकली आहे. त्या खुदाई केलेल्या ठिकाणी साईड पट्ट्या वाहून गेल्याने नाल्याचे ओढ्यात रूपांतर झाल्यासारखे दिसत आहे. मेढा-कुसुंबी-कोळघर या रस्त्याने वासोटा या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने हा रस्ता जावली बांधकाम विभागाने तात्काळ खाडीकरण डांबरीकरण करून साईड पट्ट्या व्यवस्थित कराव्यात अशी आग्रही मागणी अंधारी, कोळघर ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा रास्तारोको अंदोलनचा पर्याय हाती घेवु असा सुचक इशारा ग्रामस्थ देेत आहेत
अंधारी गावातुन जाणारा रस्ता अंरूद असुन तो पुर्णपणे ऊखडला आहे साईट पट्टया खचल्या आहेत. वारंवार ग्रामस्थ दुरूस्तीची मागणी बांधकाम विभागाकडे करत आहोत मात्र जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. तात्काळ दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थांना नाईलाजास्तव रास्तारोको अंदोलन छेडावे लागेल.
रविंद्र शेलार, अंधारी उपसरपंच