सातारा / प्रतिनिधी :
राष्ट्रीय महामार्गाच्या खंबाटकी बोगद्याचे काम करणाऱ्या गायत्री प्रोजेक्ट या कंपनीने रॉयल्टीची रक्कम न भरल्याने वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापुरकर यांनी 20 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.
या कंपनीने तब्बल 1 लाख 9 हजार 691 ब्रास गौण खनिजचे उत्खनन केले आहे. नोटीस बजावत पंधरा वाहने सिल केली असून, काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या कंपनीने फक्त सहा हजार ब्रासचे चलन भरले आहे. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी नोटीस बजावली होती. त्यानंतर दि.5 नोव्हेंबर 2020 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तरीही उत्खनन सुरुच होते. रॉयल्टीची रक्कम जोपर्यंत भरत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, हा दंड 19 कोटी 99 लाख 66 हजार एवढा आहे.
शुक्रवारी ही नोटीस बजावण्यात आली असून, सात दिवसात रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे वाई परिसरात अवैध गौण खनिजाचे उत्खनन
करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.