गोडोली / प्रतिनिधी :
प्रत्येक महिन्यात एक ग्रामपंचायतीची सभा घेणे हे सरपंचांचे कर्तव्य असून, ते पार न पाडल्यास अपात्र ठरवले जाते. मात्र सध्या कोरोनाचा कहर आणि कलम १४४ लागू असल्याने सभा घ्यावी की नाही, हा संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ सामाजिक अंतर ठेवून मास्कचा आणि सँनिटाईझर वापर करणे, बंधनकारक असून ग्रामपंचायतीच्या सभा मोकळ्या जागेत घ्या,’ असा आदेश दिला आहे.
कोरोनाचा उद्रेक, बाधितांची वाढती आकडेवारी आणि तोकडी उपचार व्यवस्था यामुळे सर्वत्र भिती, तणाव निर्माण झाला आहे. याच काळात कलम १४४ लागू असल्याने कोणत्याही ठिकाणी एका वेळेस ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस मनाई करणेत आलेले आहे. मात्र, यातून ग्रामपंचायत सभांना कलम १४४ मधून सुट देण्यात आली आहे.
वैधानिक अनर्हता टाळण्याचे दृष्टीने फक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनाच बैठकीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अन्य कोणत्याही व्यक्तीस सदर सभेसाठी उपस्थित राहणेस मनाई करणेत येत आहे.तसेच सामाजिक अंतराचे पालन करत ही सभा शक्यतो मोकळया जागेत घेण्यास सूचीत करण्यात आले आहे.
सभेत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ व इतर कायदयातील लागू असलेल्या दंडात्मक तरतूदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.