प्रतिनिधी / सातारा :
जगतापवाडीत गटाराचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गटराचे पाणी शिरत असून, तेच अशुद्ध पाणी मागील 15 दिवसांपासून नागरिकांना मिळत आहे. त्याबाबत वारंवार सातारा नगरपालिका, प्राधिकरण आणि बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या तरीही कोणीही लक्ष देईना अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, प्राधिकरणाच्या अभियंता चौगुले-मोठे मॅडम बोलण्यात पटाईत. मोठे मॅडमचा खोटेपणा उघड झाला असून, त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शाहुनगर, गोडोली, जगतापवाडीसह शहराच्या पूर्व भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. या भागात सतत काही ना काही तक्रारी असतात. मात्र, बोलक्या स्वभावाच्या व कामात कुचराई करणाऱ्या अभियंता चौगुले-मोठे मॅडम यांचे राजकीय वजन मोठे आहे. त्यांचे पतीराजही लघुपाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या प्राधिकरणाचे काम म्हणजे बैल गेला अन् झोपी गेला असेच सुरु आहे. त्याचाच प्रत्यय शाहुनगर, जगतापवाडीकरांना वारंवार येतो आहे. जगतापवाडीतील नागरिकांना अळय़ासदृश्य पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून पुरवठा होत आहे. हे पाणी दुषित येण्याचे कारणही तसेच आहे. गटराचे काम अर्धवट अवस्थेत असून ते तुंबलेल्या अवस्थेत आहे. त्याचे पाणी पिण्याच्या पाईपमध्ये शिरत असून अळय़ा, गांढूळही पाण्यासोबत येतात. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या या संकटकाळत आणखी एखादी भयान साथ उदभवण्याची भिती असून, त्या अनुषंगाने त्यांनी तसे निवेदन व फोनवरुन तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती केली होती. परंतु प्राधिकरणाच्या अभियंत्यांना पहायला वेळ नाही.
बांधकाम विभागाला गटराचे काम का थांबले हे पहायला वेळ नाही तर पालिकेच्या आरोग्य विभागाचे वेगळेच काम आहे. त्यामुळे येथील नागरिक अक्षरशः वैतागले असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर अशुद्ध पाणीच जिल्हाधिकाऱयांना भेट देवून चौगुले-मोठे यांची बदली करण्याची मागणी नागरिक करणार आहेत.