सातारा / प्रतिनिधी:
येथील शाहूनगरात गटरचे काम मंजूर आहे. मात्र अतिक्रमण झाल्याने काम केले नाही. त्याच तुंबलेल्या गटारातून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेलेली आहे. त्यामुळे चक्क पिण्याच्या पाण्यात चक्क आळ्या सापडू लागल्या आहेत. नागरिकांना या कोरोनाच्या काळात आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली असून लवकर ही कामे करण्याची मागणी केली आहे.
सातारा शहरातील शाहूनगर भागात जगतापवाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतुन गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध असा पाणी पुरवठा होत आहे.चक्क बुधवारी पाण्यात आळ्या आढळून आल्याने धक्का बसला. नागरिकांनी शोध घेतला असता सर्व्हे नंबर 162 अ मधील प्लॉट नंबर 13, 14 मध्ये अतिक्रमण झाले आहे. त्या ठिकाणी मंजूर असलेले काम झाले नाही. आरसीसी गटर बांधणे, रस्ता करणे या कामास 2019 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.त्या कामात सर्व्हे नंबर 162 अ मधील प्लॉट 13, 14 चे अतिक्रमण काढण्यात आली नाहीत. तेथून ओढ्यापर्यंत आणि सुर्या इलेक्ट्रॉनिक्सपासून ओढ्यापर्यंत दोन्ही बाजूनी गटरचे काम झालेले नाही.पुर्वीची कामे निकृष्ट दर्जाचे आहेत तर आता दोन्ही बाजूनी गटारे तुबलेली आहेत.गटाराचे काम न केल्यामुळे जगतापवाडी, जाधव कॉलनी आदीकडे जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनमध्ये गटरचे संपर्क आल्याने आळ्या पाण्यात दिसू लागल्या आहेत.सध्याच्या कोरोनाच्या महामारीत अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई निर्माण होऊ शकते. ते गटरचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर गणेश जगताप, जमानाजी कोकरे, धोंडिबा दळवी, शुभम वायदंडे, नलिनी भिसे, सौ.सुरेखा जगताप, सचिन जगताप, अली पठाण, संदीप चव्हाण, हादम शेख, जयेंद्र होवळे, विनोदकुमार संकपाळ, सुनीता कुंभार यांच्या सह्या असून तहसीलदार, मुख्याधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता यांना हे निवेदन दिले आहे.