गोडोली / प्रतिनिधी :
मोळाचा ओढा ते लिंब खिंडीदरम्यानच्या रस्त्याचे पुढे काम सुरू असताना मागे रस्ता उखडू लागला आहे. डांबर नाही तर जळके डिझेल टाकून हा रस्ता केला आहे. काम सुरू असताना बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित नसताना कामगारांनी केलेल्या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट काम केले असल्याचा आरोप करत नव्याने रस्ता करा अन्यथा आंदोलन करू,असा इशारा वर्येचे माजी सरपंच विशाल ननावरे यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोळाचा ओढा ते लिंबखिंडी पर्यंतच्या रस्त्याच्या मजबुती करणाचे काम सुरू आहे. वर्ये येथील एका शाळेसमोर केलेल्या रस्त्याचे काम पाच दिवसात उखडल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. काम दिलेल्या ठेकेदाराने डांबर नाही तर जळक्या ऑईलचा वापर करून रस्ता केल्याचे अनेक जण सांगतात. रस्ता करताना बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराचा तज्ञ कोणी हि दिसले नसल्याचा आरोप वर्ये ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केला.
उघडलेल्या रस्त्यावर दोन दिवसात काही जण घसरल्याने भविष्यात अपघात होऊ शकतात. निविदेप्रमाणे या रस्त्याच्या कामाचे काम आणि गुणवत्ता बांधकाम विभागाने तपासणी करण्याची मागणी वर्ये ग्रामस्थांनी केली आहे.
सदर रस्त्याचे काम पुन्हा केले जावे, अन्यथा आंदोलन करणार असल्याचे माजी उपसरपंच बबन निकम, राजू तपासे, तानाजी ननावरे, हणमंत जगताप यांनी सांगितले. यावेळी सौरभ ननावरे, कमलाकर साबळे, विजय ननावरे, रमेश ननावरे, सुनील ननावरे, विजय ननावरे आदी ग्रामस्थांनी उखडलेल्या रस्त्यावर फुलं वाहून बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा निषेध व्यक्त केला.