प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात बाधितांची संख्या 800 च्या पटीत वाढू लागल्याने वातावरण पॅनिक होवू लागलेय. त्यामुळे जनमानसात पुन्हा 14 दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी चर्चा सुरु झालीय. मात्र त्याला काहींचा विरोध देखील होतोय. सोशल मिडियावर याबाबत जाहीरपणे डिबेट सुरु झालाय. कंटेन्मेंट झोन मायक्रो झाले अन आता ते इतिहासजमा होत असून सध्या जिल्हय़ात लक्षणे नसलेले पण बाधित असलेले 3 हजार 78 नागरिक होम आयसोलेट आहेत. उपचारार्थ रुग्णांमधून ही संख्या वजा केली तर प्रत्यक्ष उपचारार्थ असलेल्यांची संख्या फक्त साडेतीन हजारांच्या आसपास आहे. सातारा, कराडसह जिल्हा हॉटस्पॉट झाल्याने संसर्ग साखळय़ा तोडण्यासाठी प्रशासनासह नागरिकांना पराकोटीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्ह्यात 15 सप्टेंबर पर्यंत सलून दुकाने बंद राहणार असून मंगळवारपासून वाढत्या बाधितांच्या संख्येने जावली तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 827 जणांचा अहवाल बाधित आला असून सलगपणे 800 च्या पटीत संख्या वाढत असताना कोरोनामुक्तीचा आलेखही उंचावत आहे. कोरोनामुक्तीचा आकडाही 10 हजार पार करुन गेला असला तरी संसर्ग थांबण्याची गरज आहे. रविवारी जिल्हय़ात 15 बाधितांचा मृत्यू झाला असून सायंकाळी 306 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 498 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील 306 नागरिकांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 306 नागरिकांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्तांंची संख्या 10 हजार 777 वर गेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.
वाईत कोरोनाबाधिताची आत्महत्या
वाईतील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. संचित कोविड रुग्णालयानजीक रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडलीय. पहाटेच हे 65 वर्षीय रुग्ण पळून गेले होते. मात्र त्यांना परत आणण्यात आले होते. दुपारी डॉक्टर व सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून त्यांनी पळ काढला व लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाढणारा मृत्यूदर चिंताजनक
गेल्या महिन्यापासून, वाढलेला मृत्यूदर चिंताजनक असून दररोज दोन आकडी संख्येत कोरोना बळींची संख्या येत आहे. सातारा तालुक्यात आतापर्यंत 123, कराड 81, वाई 52, खटाव 40, पाटण 40, फलटण 33, खंडाळा 23, कोरेगाव 29, जावली 19 माण 14, महाबळेश्वर 8 असे कोरोना बळी गेलेले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात मोठी संख्या आहे. तर कराड हॉटस्पॉट असून देखील तेथील मृत्यूदर कमी आहे. आतापर्यंत एकूण कोरोना बळींची संख्या 488 एवढी असून ती पाचशेच्या उंबरठय़ावर उभी असल्याने मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
सोशल मिडियावर लॉकडाऊनची चर्चा
जिल्हय़ाने पहिले तीन महिने कडक लॉकडाऊन पाळला आहे. त्यावेळी टेस्टिंगची संख्या अपुरी होती. आता टेस्टिंग वाढवले आहे. बाधितांची संख्या अंगावर काटा आणणारी येत असल्याने जनमानसात जिल्हय़ात लॉकडाऊन हवाय यावर चर्चा सुरु झाली असून सोशल मिडियावर नागरिक मते मांडू लागलेत. अनेक गावात संसर्ग साखळय़ा वाढू लागल्याने त्या तोडण्यासाठी जिल्हय़ातील काही गावे स्वतः पुढाकार घेत 14 दिवसांचा लॉकडाऊन करु लागली आहेत. लोकांना कोरोना संकटातून लवकर बाहेर पडायचे असल्याची ही भावना आहे.
लक्षणे नसतील तर बेड अडवू नका
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्ह्यात भीती निर्माण होतेय. मात्र टेस्ट केल्यानंतर अनेकांना कोणतीही लक्षणे नसतात. त्यांना त्यांच्या घरातील सोयीसुविधा पाहून होम आयसोलेट केले जाते. मात्र यापैकी काही जणांना भीती वाटत असल्याने ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे ज्यांना खरच गरज आहे अशा रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. लक्षणे नसतील, काही त्रास होत नसेल तर बेड अडवू नका, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
जिल्हय़ात 3 हजार 78 होम आयसोलेट
सध्या जिल्हय़ात 18 हजार 490 एकूण बाधितांची संख्या प्रचंड दिसत असली तरी आरोग्य विभागाने 10 हजार 471 जणांना कोरोनामुक्त केले आहे. उर्वरित 7 हजार 531 ऍक्टिव रुग्ण संख्या असली तरी त्यातील लक्षणे नसलेले पण बाधित अहवाल आलेले 3 हजार 78 नागरिक होम आयसोलेट आहेत. त्यामुळे उर्वरित बाधित असलेल्या प्रत्यक्ष 4 हजार 453 जणांपैकी विविध कोरोना केअर सेंटर कोरोना केअर सेंटरमध्ये 1 हजार 23 जण क्वारंटाईन आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष उपचारार्थ असलेल्यांची संख्या फक्त 3 हजार 430 एवढीच आहे.
जिल्हय़ात 15 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथे पुसेगाव ता. खटाव 55 वर्षीय पुरुष, त्रिपुरी ता. कोरेगाव 70 वर्षीय पुरुष, चंदननगर कोडोली 73 वर्षीय पुरुष, कोर्टी ता. कराड 70 वर्षीय महिला, तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये अंगापुर ता. सातारा 75 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव 75 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा 86 वर्षीय पुरुष, मिरेवाडी फलटण 70 वर्षीय पुरुष, कोळकी फलटण 82 वर्षीय पुरुष, साखरवाडी फलटण 66 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण 70 वर्षीय महिला, निसराळे ता. सातारा 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा 61 वर्षीय महिला, लिंब ता. सातारा 61 वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव 75 वर्षीय पुरुष, असे एकूण 15 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
303 जणांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20,उपजिल्हा रुग्णालय फलटण 63 खंडाळा 52, रायगांव 20, पानमळेवाडी 40,मायणी 93, महाबळेश्वर 15,असे एकूण 303 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 49,570
एकूण बाधित 18,998
एकूण कोरोनामुक्त 10,777
मृत्यू 488
उपचारार्थ रुग्ण 7,723
रविवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 498
एकूण मुक्त 306
एकूण बळी 15