अचूक बातमी “तरूण भारत”ची, बुधवार 2 मार्च 2022, सकाळी 11.50
● तिसरी लाट जिल्हय़ात ओसरली
● सहा नवे रुग्ण
● आठ तालुके निरंक
प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाची तिसरी लाट राज्यात ओसरू लागल्याने शासनाने रूग्णसंख्या कमी असलेले जिल्हे निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हय़ातही रूग्ण संख्या कमी झाली असून जिल्हा प्रथमच निर्बंधमुक्त होण्याच्या वाटेवर आहे. जिल्हाधिकारी याबाबत कधी घोषणा करणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काल रात्री आलेल्या अहवालात जिल्हय़ात केवळ सहा रूग्ण आढळले आहेत.
आपत्ती व्यवस्थापनकडून आढावा
राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत राज्यातील रूग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार रूग्णसंख्या कमी असणारे व लसीकरण 70 टक्केवर झालेले जिल्हे निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. मात्र रूग्णसंख्येच्या प्रमाणात त्या त्या जिल्हय़ात निर्णय घेण्याचे अधिकारी स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ातील लसीकरण व रूग्णप्रमाण पाहता जिल्हा निर्बंधमुक्त होण्याच्या वाटेवर आहे. याची घोषणा कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. उपहारगृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासह अजूनही विविध निर्बंध लागू आहेत.
तीन तालुक्यात सहा रूग्ण
काल रात्री आलेल्या अहवालात जिल्हय़ात सहा रूग्ण आढळले असुन कराडमध्ये 4, खंडाळा 1 व फलटण 1 असे रूग्ण प्रमाण आहे. एकूण 688 चाचण्यांची करण्यात आल्या असून पॉझिटिव्हीटी 0.87 टक्के आहे.
बुधवारी
नमुने-688
बाधित-06
बुधवारपर्यंत
नमुने-25,53,546
बाधित-2,79,041
मृत्यू-6675
मुक्त-271528