शवविच्छेदनाच्या खोलीबाहेरच्या अस्वच्छतेचा रहिवाशांना नित्याचेच आजारपणाला निमंत्रण
प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या लागून असलेल्या अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी आणि सह्याद्री कॉलनी या तीन कॉलनीमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत अडकल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील अस्वच्छता, शवविच्छेदन खोलीबाहेर टाकलेले वेस्टेज साहित्य, रद्दी बेड्स, रुग्णांचे रद्दी कपडे तसेच सातत्याने कोपऱयात टाकले जातात. त्यामुळे भिंतीला लागून असलेल्या घरांतील रहिवांशाना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. डासांचा सतत प्रादुर्भाव होत असल्याने मच्छदरदानी, डासांच्या अगरबत्त्या वापरुनही नागरिक दमले. जिल्हा रुग्णालयाला विनंत्या करुनही झाल्या आता आंदोलनाच्या पवित्र्यात नागरिक आहेत.
सदर बाजार येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे अजिंक्य कॉलनी, सह्याद्री कॉलनी आणि रामकृष्ण कॉलनी अशा तीन कॉलन्या आहेत. या तिन्ही कॉलन्यांना यापूर्वी एवढा त्रास होत नव्हता. परंतु गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील अस्वच्छतेचा त्रास होतो. रुग्णालयाच्या पश्चिम बाजूला शवविच्छेदन खोली आहे. त्या खोलीला लागूनच कोपऱ्यात झाडीत रुग्णालयात वापरलेले रद्दी झालेले बेड्स, रुग्णांचे वापरलेले रद्दी कपडे तसेच टाकून देण्याचे वारंवार प्रकार होतात.
तसेच जैविक कचरा व शवविच्छेदन केल्यानंतर जे वेस्टेज साहित्य असते ते तसेच कोपऱ्यात ठेवून दिले जाते. त्यापासून नजिक असलेल्या तीन कॉलन्या आहेत. त्या कॉलन्यांना नित्याचा त्रास होत आहे. या कचऱ्यापासून होणारे डास, दुर्गंधी याला सामोरे जावे लागत आहे. कित्येकदा निवेदने, अर्ज विनंत्या करुनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक ही समस्या घेवूनच रहातात. कोरोनाच्या काळातही त्यांनी ही समस्या घेवूनच त्रास सहन केला. आता मात्र, आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.