प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा पोलीस दल गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी उत्तम कामगिरी करत आहेत. महिला सुरक्षितेला प्राधान्य देवून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हे उपक्रम फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात राबविण्यात येत आहेत. यामुळे 31 जिल्ह्यामधून 6 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट घटक म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही अभिमानाची बाब असून, यासाठी पोलीस दलांची चांगली बाजू ही नागरिकांना दिसली पाहिजे. म्हणून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचा सत्कार करून सर्व जिल्हा पोलीस दलाच्या पाठीवर कौतुकांची थाप देत आहे, असे मत राज्यगृहमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट घटक म्हणून घोषित झाल्यानंतर गृहराज्यमंत्री देसाई यांनी पोलीस अधिक्षक बन्सल यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधिक्षक बन्सल म्हणाले, महिला बाबत वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस प्रथदर्शी प्रकल्प सूरू आहे. या प्रकल्पात अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत. कायद्याविषयक माहिती, तसेच पोलीस दिदी, पोलीस काका हे मुलीपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवत आहेत. गेल्या तीन महिन्यापासून सूरू झालेल्या या प्रकल्पाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहेत. आता मुली पुढे येवून तक्रार देत आहेत. यामुळे गुन्हेगाराला पकडण्यात यश येत आहेत.